सातारा : ऊस दराची कोंडी आज फुटणार?

सातारा : ऊस दराची कोंडी आज फुटणार?
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरात ऊस दराचा तिढा सुटल्यानंतर सातार्‍यातील साखर कारखानदारांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे 'स्वाभिमानी'सह विविध शेतकरी संघटनांनी रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन केले. यावर दै. 'पुढारी'नेही आवाज उठवल्यानंतर ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. प्रशासनाने लावलेली बैठक गुरुवार (दि. 30) होत आहे. यामध्ये ऊस दराचा तोडगा निघेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक पीक हे उसाचे असून, जिल्ह्यातील ऊस दर काय असणार? याकडे लक्ष लागले आहे. पहिल्या बैठकीत ऊस दरावर चर्चाच झाली नव्हती. या बैठकीत तरी ऊस दराची कोंडी फुटणार का, असा सवाल केला जात आहे. राज्य सरकारच्या सूचनेनंतर दि. 1 नोव्हेंबर नंतर गळीत हंगाम सुरू झाला आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस दर काय असावा, यावर चर्चा करण्यासाठी प्रशासनाने बैठक बोलावली होती. मात्र, साखर कारखानदारांच्या अधिकार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना विचारून सांगतो, असे म्हणत टोलवाटोलवी केली. याच दरम्यान, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गत हंगामातील उसाचे 400 रुपये व 3,500 रुपयांच्या उचलीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात रान पेटवले. ठिकठिकाणी रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन केले. कोल्हापुरात आंदोलन तीव्र असताना सातार्‍यातही शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या.

सातारा, कोरेगाव, खटाव, फलटण येथे शेतकरी संघटनांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तसेच काही ठिकाणी ऊस वाहतूकही रोखण्यात आली. कराड तालुक्यातही रास्ता रोको होरऊन ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवला होता. आता कोल्हापूरच्या ऊस दराचा तिढा सुटल्यानंतर सातार्‍यात काय होणार? याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. आंदोलने करूनही कारखाने दखल घेत नसल्याने संघटना आक्रमक झाल्या. याचबरोबर दै. 'पुढारी'नेही एफआरपीची कोंडी फोडण्यासाठी आवाज उठवला. याची तत्काळ जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. 'पुढारी'नेे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर प्रशासनाने लागलीच बैठक लावली. गुरूवारी ही बैठक होत आहे. यामध्ये ऊस दराचा तोडगा निघेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. या बैठकीतही तोडगा न निघाल्यास जिल्ह्यात संघटना आक्रमक होणार आहेत.

कोल्हापूर पॅटर्न राबवणार का?

राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांचे अधिकचे नुकसान रोखण्यासाठी थोडी माघार घेत एफआरपी अधिक 100 आणि गत हंगामात 3 हजारांपेक्षा जास्त देणार्‍या कारखान्यांनी 50 व त्यापेक्षा कमी दर देणार्‍या कारखान्यांनी 100 रुपये देण्याचा ठराव केला. सांगलीतही मागील उचलीवरून वाद सुरू आहे. सातार्‍यात आज बैठक होत असताना कोल्हापूर पॅटर्न राबवणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news