

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा
हिवाळी अधिवेशनावरुन आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhau khot) यांची राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आटपाडी येथे महावितरण कार्यालयावर काढलेल्या मोर्चा दरम्यान ते बोलत होते.
महावितरण कंपनीची मनमानी कारभाराच्या विरोधात आज भाजपच्यावतीने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात सदाभाऊ खोत,आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, अरुण बालटे, जयवंत सरगर, प्रणव गुरव, विष्णुपंत अर्जुन, भाजप कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.
आटपाडी बसस्थानकापासून महावितरणच्या निषेधार्थ घोषणा देत निघालेला मोर्चा मुख्य बाजारपेठ, बाजारपटांगण,अण्णाभाऊ साठे चौकातून महावितरण कार्यलयावर पोहोचला.
यावेळी बोलताना आ. खोत म्हणाले, महावितरणने बिले दुरुस्त करून द्यावीत. कनेक्शन आणि डीपी जोडावेत अन्यथा बिल भरणार नाही असा इशारा खोत यांनी दिला. (MLA Sadabhau khot)
सरकार अधिवेशनातून सारखं पळ काढत आहे. हे अधिवेधन ओमायक्रॉनच्या पाठीवर बसून आलं आहे. त्यामुळे पाच दिवसाचेच हे अधिवेशन घेतायत.
मुख्यमंत्री साहेब, महालातून बाहेर या अन् जनतेचे प्रश्न जाणून घ्या असे सांगत त्यांनी अधिवेशनातून पळ काढणाऱ्यांना वाघ म्हणत नाहीत.
वाघ हा डरकाळ्या फोडतो, वाघाचे एकबी लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये दिसत नाही. वाघ बिळात जाऊन बसतोय, बिळातून बाहेर या आणि खरा वाघ दाखवा अशी खरमरीत टिका आमदार सदाभाऊ खाेत यांनी केली. (MLA Sadabhau khot)
अधिवेशनात भष्टाचार बाहेर येईल आणि अनेकांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागेल अशी भिती महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे.
या भीतीपोटीच हे सरकार सातत्याने कोरोनाच्या नावाखाली लपून बसत आहे. हे सरकार म्हणजेच कोरोनाचे भूत झालेय अशीही टीका आमदार सदाभाऊ खाेत यांनी केली. (MLA Sadabhau khot)
यावेळी आमदार पडळकर यांनी, चुकीची आणि वाढीव बिले देत महावितरणने शेतकऱ्यांवर दरोडा टाकला आहे.
वीज गळती आणि चोरी लपवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बदनामीचे हे षड्यंत्र असल्याची टीका केली.
आटपाडी आणि राज्यातील सर्व वाढवलेली बिले दुरुस्त करा असे सांगितले.
तोडलेली कनेक्शन जोडा, बिल भरायला मुदत देणार नसेल तर एक रुपया सुद्धा भरणार नाही असा इशारा महावितरणला दिला.
जयंत पाटील आणि सरकारने जंग जंग पछाडले पण मी बैलगाडी शर्यत घेऊन दाखवली. ऑगस्टमध्ये शर्यत सुरू करू असे सांगितले पण अजून ती सुरू झाली नाही.
लोकांच्या न्याय हक्कासाठी लढताना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिले जाते. मात्र ते आमच्यासाठी नवीन नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतच राहू.
यावेळी आंदोलकांच्या मागणीनुसार कार्यकारी अभियंता व्ही. पी. इधाते, संजय बालटे यांनी चुकलेली बिले दुरुस्त करून देऊ असे सांगितले.
तसेच बिल भरण्यासाठी मुदत देण्याचे, तसेच तोडलेली कनेक्शन आणि डीपी सुरू करण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा