सातारा : कोंडी फुटली; शेतकर्‍यांना वाढीव दराची अपेक्षा | पुढारी

सातारा : कोंडी फुटली; शेतकर्‍यांना वाढीव दराची अपेक्षा

महेेंद्र खंदारे

सातारा :  दै.‘पुढारी’च्या रेट्यानंतर सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली आहे. या बैठकीत बहुतांश कारखानदारांनी 3100 चा दर जाहीर केला. हा दर म्हणजे पहिली उचल असून अंतिम एफआरपी हंगामाच्या शेवटी होणार आहे. यासाठी आणखी 3 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. जसा साखर उतारा वाढेल तशी एफआरपीची रक्कमही वाढणार आहे. त्यामुळे अंतिम दर 3500 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटना याच आकड्यावर ठाम असल्यामुळे यंदा गतवर्षीपेक्षा जास्त दर मिळणार आहे.

वाहतूक तोडणीचे ऑडिट करा

 जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बोलावलेल्या बैठकीत मोठया संख्येने शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी कारखान्यांकडून कपात करण्यात येणार्‍या वाहतूक तोडणीवर बोट ठेवले. कारखान्यांकडून जी वाहतूक तोडणी घेतली जाते त्यातील सुमारे 150 रूपये टोळ्यांना कमी दिले जातात मग हे 150 रुपये कुठे जातात? यासाठी वाहतूक-तोडणीचे ऑडिट करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी आले अ‍ॅक्शन मोडवर

स शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी आंदोलनाचे रान पेटवल्यानंतर बैठकीत दर जाहीर करण्याशिवाय कारखान्यांना कोणताच पर्याय शिल्लक राहिला नव्हता. यापूर्वी कारखानदार फक्त अंदाज वर्तवत होते. मात्र, ‘पुढारी’ची भूमिका आणि जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर आल्याने कारखानदारांना नमती भूमिका घ्यावी. बैठकीतच कारखान्यांवर कारवाई करण्याची शिफारस सरकारकडे करण्याचा स्टँड जिल्हाधिकर्‍यांनी घेतल्यामुळेच ही कोंडी फुटली.

फलटणमध्ये दरावरून वॉर

बैठकीपूर्वीच फलटण तालुक्यातील श्रीराम कारखान्याने 3 हजार 51 रूपये दर जाहीर केला होता. बैठकीतही त्यांनी तोच दर असल्याचे सांगितले. तर बैठकीमध्ये स्वराजने 3101 रूपयांचा दर जाहीर केला. याचवेळी शरयूनेही 2900 दर असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही तासानंतर आम्ही 2900 तर 3151 दर देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे फलटण तालुक्यात ऊस दरावरून वॉर झाल्याचे दिसून आले.

कोल्हापूर व सातार्‍यातही ऊस दरासाठी स्वाभिमानीने आंदोलन केले. सातार्‍यात दै. ‘पुढारी’ने हा विषय उचलून धरल्याने शेतकर्‍यांना न्याय मिळाला. दर जाहीर झाल्याने शेतकर्‍यांनी ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा हे आता स्पष्ट झाले आहे. संघटना म्हणून आमच्या मागणीसाठी पाठपुरावा करणार आहोत.
राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

Back to top button