सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दि. 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला असून ते पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. पाटील यांच्या सातारा जिल्ह्यात दि. 17 नोव्हेंबर रोजी कराड व दि. 18 नोव्हेंबर रोजी मेढा व वाई येथे अशा तीन सभा होणार आहेत. जरांगे-पाटलांच्या सभेची सर्वांना उत्सुकता लागली असून तयारीसाठी बैठकांचा सपाटा सुरु आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेले 10 ते 15 वर्षे मनोज जरांगे-पाटील काम करत आहेत. अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दोन टप्प्यात आंदोलन केले.
सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला. जरांगे-पाटलांच्या सूचनेनुसार जिल्हयासह राज्यात सूचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरु आहेत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दि. 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला असून ते पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
राज्यातील मराठा समाजाची गाठीभेटी घेण्यासाठी मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करत आहेत. दि. 15 नोव्हेंबर 2023 पासून ते दि. 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत हा तिसरा टप्पा असणार आहे. तिसर्या टप्प्यातील बुधवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी सभेला वाशी येथून सुरुवात होणार आहे. शुक्रवार, दि. 17 रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर येथून कराड येथे सभा होणार आहे. तर शनिवारी (दि. 18) मेढा व वाई येथे सभा होणार आहे. तर तिसर्या टप्पाचा शेवट अहमदनगर जिल्ह्यातील धोंडेगाव येथील सभेने होणार आहे. जिल्ह्यात सभा होणार असल्याने गावोगावी, सर्कलनिहाय बैठकांचा सपाटा सुरु झाला आहे.
ऐतिहासिक सभा सातारा जिल्ह्यात होणार असून याची तयारी सुरू
झाली आहे.
राजधानी सातार्यात मनोज जरांगे-पाटलांच्या सभेचा जो सोशल मीडियावर मेसेज फिरतोय तो चुकीचा आहे. दि. 18 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली सभा काही तांत्रिक कारणाने पुढे ढकलण्यात आली आहे. राजधानीतील संघर्ष योद्ध्याची सभा ही निर्णायक व खूप मोठी असणार आहे. राज्यातील तिसर्या फेरीतील शेवटच्या टप्प्यातील सभा सातार्यात होईल. सातार्यात होणार्या सभेला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले हे दोघेही उपस्थित राहणार असल्याने ना भूतो ना भविष्यती अशी सभा होणार असून मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातार्याच्यावतीने नियोजन सुरु केले असल्याचे समन्वयकांनी सांगितले. या सभेची तारीख निश्चित झाल्यानंतर कळवण्यात येणार आहे.