शेतीमुळे जोडली मातीशी नाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

शेतीमुळे जोडली मातीशी नाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : गावी आलो की थोडीफार का होईना शेती करतो. यातून मनाला आनंद आणि समाधान मिळतं. येथील मातीशी आपली नाळ जोडली जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्हा दौर्‍यावर असून रविवारी त्यांनी आपल्या शेतीत फेरफटका मारला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व मान्यवर उपस्थित होते. अलिकडे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्याने बांबू लागवड करणे गरजेचे आहे. केवळ पावसाळ्यातच नाही तर इतर वेळी ड्रिपवरही बांबू शेती झाली पाहिजे. येथील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन समूह शेती करावी. पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने ग्लोबल वॉर्मिंग, अवकाळी पाऊस, पाऊस कमी पडला, पाऊस जादा पडणे, असे जे काही घडत आहे याला बांबू लागवड केल्यास आळा बसेल. कारण बांबूंपासून जादा ऑक्सिजनची निर्मिती होते. यामुळे बांबू लागवड ही नवसंजिवनी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बांबू लागवडीसाठी 10 हजार हेक्टर जमिन सातारा जिल्हाधिकार्‍यांनी उपलब्ध केली ही अभिनंदनीय गोष्ट आहे. महाराष्ट्रात 10 लाख हेक्टर बांबू लागवडीचे उद्दीष्ट असून असे झाले तर हे राज्य जगातील सर्वाधिक बांबू लागवड असलेले राज्य म्हणून ओळखले जाईल. बांबूंपासून अनेकविध बायप्रोडक्ट तयार होतात. अगदी फाईव्हस्टार हॉटेलपासून एअरपोर्टपर्यंतचं फर्निचर यापासून बनवता येईल, याचा लाभ शेतकर्‍यांना होईल, असेही ते म्हणाले. शेतीतून फेरफटका मारल्यानंतर हळद पिकात त्यांनी कोळपणी केली. रोपांना भर घालण्याचे कामही केले.

Back to top button