आ. गोरेंमुळेच माण-खटाव विकासाच्या वाटेवर : राधाकृष्ण विखे-पाटील | पुढारी

आ. गोरेंमुळेच माण-खटाव विकासाच्या वाटेवर : राधाकृष्ण विखे-पाटील

खटाव, पुढारी वृत्तसेवा : आ. जयकुमार गोरेंसारख्या कल्पक आणि धडाडीच्या नेतृत्वामुळेच माण व खटाव तालुक्यांचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच म्हसवड शहरासाठी 80 कोटींची पाणी योजना मंजूर झाली आहे. अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मदत करण्यात आमचे सरकार कायमच तत्पर राहिले आहे. 12 कोटी जनतेला आरोग्य योजनांचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. चाळीस वर्षे सत्तेत असणार्‍यांनी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. त्यांनी जनतेची लूट केल्याने सत्तेतून बाहेर जावे लागले, आता त्यांचे समूळ उच्चाटन करा, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून म्हसवड शहराच्या 80 कोटींच्या पाणी पुरवठा योजना आणि इतर 22 कोटींच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, आ. राहुल कुल, सोनिया गोरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, माजी जि. प. सदस्य अर्जुन काळे, अरुण गोरे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, धनंजय चव्हाण, दादासाहेब काळे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, विजय धट, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, वैशाली लोखंडे, साधनाताई गुंडगे, धनश्रीदेवी राजेमाने, अकिल काझी, डॉ. वसंत मासाळ, इंजि. सुनिल पोरे, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, सिध्दार्थ गुंडगे, दत्तोपंत भागवत उपस्थित होते.

ना. राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्यसरकारच्या माध्यमातून 2024 पर्यंत सर्व घरांमध्ये पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जनतेच्या मनातील सरकार राज्यात आल्याने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. एक रुपयात पिक विम्यासह शेतकर्‍यांना सर्व प्रकारची मदत केली जात आहे. दहा कोटी खर्च करून दहीवडीला शेळी मेंढी संशोधन केंद्र आणि दीड महिन्यात म्हसवड येथे तहसील कार्यालय सुरु करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, माण, खटावमध्ये गेल्या साठ वर्षात झाला नाही त्यापेक्षा कैक पट अधिक विकास गेल्या बारा वर्षात आ. जयकुमार गोरे यांनी करुन दाखवला आहे. बारामती आणि काही फलटणकरांनी आजपर्यंत या भागाला विकासापासून वंचित ठेवण्याचे पाप केले.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, सिध्दनाथाच्या नगरीतील माता भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहरासाठी 80 कोटींची पाणी योजना मंजूर करु शकलो. माझ्या तिन्ही निवडणुकांमध्ये म्हसवडकर जनतेने मला भरभरून आशिर्वाद दिले. त्यातून उतराई होण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आलो आहे. आमची सत्ता असताना कोट्यवधींचा निधी आणून म्हसवडचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. अनेक विकासकामे मार्गी लावली होती. परिवर्तन झाल्यावर मात्र शहराची अवस्था बकाल झाली आहे.

आम्ही आता पाणीयोजनेसह 102 कोटींच्या निधीतून अनेक कामे साकारत आहोत. छ. शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले यांचे पुतळे आणि सुशोभीकरणासाठी कोक्यवधींचा निधी आणला आहे. बारामती आणि फलटणकरांनी टोकाचा विरोध केला तरी संघर्ष करुन या भागात एमआयडीसी मंजूर करुन आणली आहे. 25 हजार जणांना याद्वारे रोजगार उपलब्ध होणार आहे. मतदारसंघातील 97 गावांमध्ये उरमोडीचे पाणी पोहचले आहे. लवकरच जिहे कठापूरचे पाणी येत आहे. 44 गावांना टेंभूचे अडीच टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग नुकताच मोकळा झाला आहे. कुवत नसलेली लबाडांची टोळी पाणीप्रश्न कधीच सोडवू शकत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. यावेळी आ. राहुल कुल, इंजि. सुनील पोरे, डॉ. मासाळ, विजय धट, रेश्मा कलेढोणे यांनी मनोगत व्यक्त केले.

पावसातही जनसमुदायाची उपस्थिती…

अत्यंत जिव्हाळ्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 80 कोटींच्या योजनेद्वारे सुटल्याचे पहायला हजारोंचा जनसमुदाय पडत्या पावसात उपस्थित होता. दिवसभर गजीनृत्याने कार्यक्रमात रंगत आणली होती. आ. जयकुमार गोरेंसह अनेकांनी ढोल वाजवत ठेका धरला. जलकलश डोक्यावर घेऊन शेकडो महिलांनी शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढली.

भारतीय जनता पार्टीत इनकमिंग फर्मात…

आ. जयकुमार गोरेंच्या अश्वासक आणि विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवत दादासाहेब माळी, रवी कदम, सुनील शिंदे, शिवाजी माने, विशाल कदम, पंकज शिलवंत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Back to top button