सातारा : दहशतवाद्यांनी चांदोली धरण परिसराची रेकी केल्याने खळबळ | पुढारी

सातारा : दहशतवाद्यांनी चांदोली धरण परिसराची रेकी केल्याने खळबळ

शित्तूर वारुण; पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांनी अटक केलेल्या त्या दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूरनजीक महामार्गावर एका गावात दोन दिवस वास्तव्य केल्याचे व त्याचदरम्यान चांदोली धरण परिसराची रेकी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने चांदोली धरण परिसरात खळबळ उडाली आहे.

व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियामध्ये रविवारी दिवसभर याच वृत्ताच्या पोस्ट परिसरामध्ये फिरत होत्या. दहशतवाद्यांनी या परिसराची रेकी नेमकी का केली असेल? त्या पाठीमागे दहशतवाद्यांचा काय उद्देश असावा? याबाबतीत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. चांदोली धरण परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. हे धरण महाराष्ट्रातील दोन नंबरचे मातीचे धरण आहे.

पाणी साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी आहे. या धरणामुळेच हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. या धरणावर दहशतवाद्यांची वाकडी नजर पडली आहे. धरण क्षेत्रात काही घातपात घडवण्याचे जर दहशतवाद्यांचे मनसुबे असतील तर ते वेळीच उधळून लावण्यासाठी या टोळीत सामील असलेल्या सगळ्या दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करावी व कडक कारवाई करण्यात यावी, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

 

  हेही वाचा : 

  • पुणे : दहशतवाद्यांनी वापरलेला ड्रोन एटीएसला सापडला
  • 2000 notes back in banking system : २ हजार रुपयांच्या ८० टक्के नोटांची बँकवापसी
  • राहत्या घरात कोब्रा जातीच्या नागाची ५ पिल्ले! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | Cobra Cub

 

Back to top button