अजित पवारांचा निर्णय राजकारणातील दांभिकपणा : पृथ्वीराज चव्हाण

अजित पवारांचा निर्णय राजकारणातील दांभिकपणा : पृथ्वीराज चव्हाण
Published on
Updated on

खटाव; पुढारी वृत्तसेवा :  एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला. दुसरीकडे अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी उल्लेख केला होता. त्यानंतर लगेचच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हा राजकारणातील दांभिकपणा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. दरम्यान, सत्तेसाठी भाजपा आणि मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे राज्यातील जनतेने पाहिले असल्याचेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

वडूज येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, सचिव राजेंद्र शेलार, तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, बाबासाहेब माने आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्याच्या राजकारणात काल चुकीची घटना घडली. हा राष्ट्रवादीमधील विषय आहे. त्यांची पक्ष म्हणून रस्त्यावरील लढाई सुरु झाली आहे. त्या लढाईचे रणशिंग खा. शरद पवार यांनी कराडमधून फुंकले आहे. संपूर्ण राज्यभर दौरा करून नव्याने पक्ष उभारणीचा निर्णय त्यांनी घेतला आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधात 17 पक्षांची आघाडी झाली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी हा महत्त्वाचा पक्ष आहे. राष्ट्रवादीत विभाजन झाले असले तरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आमच्या आघाडीतील घटक पक्ष राहणार आहे.

भाजप, शिंदे गट व अजित पवार यांच्या ट्रिपल इंजिनच्या सरकारबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांना समर्थन देणार्‍या आमदारांच्या निलंबनाबाबत विधीमंडळ अध्यक्षांकडे कारवाई सुरू आहे. 18 ऑगस्टपर्यंत त्यांना अंतिम निर्णय द्यावा लागेल. तो निर्णय शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना निलंबित करण्याशिवाय दुसरा काही होऊ शकत नाही. त्यांचे निलंबन अटळ आहे. त्यावेळी मुख्यमंत्रीपद रिक्त होईल. अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले असल्याचे समजत असल्याचेही त्यांनी सांगितले.

…अन्यथा त्यांचेही निलंबन

ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले होते त्यांना चौकशीची भीती दाखवली गेली. अजित पवार यांच्याबरोबर मंत्रीपदाची शपथ घेणार्‍या नऊ आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या राज्याच्या अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांकडे निलंबनाची तक्रार दिली आहे. त्यावर न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या 53 पैकी दोन तृतीयांश म्हणजे 36 आमदार अजित पवार यांच्याकडे असतील तर पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून ते सुटतील, अन्यथा निलंबित होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news