केंद्रातील राजकारणात मला रस नाही : अजित पवार

केंद्रातील राजकारणात मला रस नाही : अजित पवार
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  माझ्यावर महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. पक्षाचे विविध दौरे, पक्षीय अधिवेशने व कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभर फिरत असून, मी माझी जबाबदारी पार पाडतच आहे. माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय राजकारणातील कामाची पद्धत यात बराच फरक आहे. मला
केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नसून, राज्यात काम करणार असल्याची स्पष्टोक्ती विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, सातारा लोकसभेला कोण उमेदवार हे इतक्यात सांगता येणार नाही. अनेक उमेदवार आमच्यासमोर आहेत. कोणी गेले म्हणून पक्ष संपत नाही. जिल्ह्यातील काही ठिकाणी नवीन नेतृत्व उभे करू. कारण महाविकास आघाडीचे जागा वाटप व्हायचे आहे. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवारच येथून विजय होईल, असे अजितदादांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आ. अजित दादा म्हणाले, माझ्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. ज्यांचे जास्त आमदार त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो. विरोधी पक्षनेतेपदाचे कामकाज मी करतोय. जाणीवपूर्वक माझ्याबाबत नाराजीच्या बातम्या येत आहेत. बातम्यांचे खंडण करायचे व काय झाले हे सांगण्यातच माझा जास्त वेळ जात आहे.
भाकरी फिरवण्याबाबत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेबाबत आ. अजितदादा म्हणाले, त्यांना काय म्हणायचे हा त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीला काय करायचे आहे ते राष्ट्रवादीची कार्यकारिणी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी ठरवतील. पवार साहेब पुन्हा काहीही बोलले नाहीत. हा प्रश्न पक्षांतर्गत आहे. भाजपने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. आमची आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. विरोधकांकडून होत असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर ते म्हणाले, प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याचे काम करतो. सरकार असते त्या पक्षात अनेकजण जातात. सातार्‍यातील काही आमदार भाजपमध्ये गेले, सरकार आल्यावर तुम्हाला मंत्री, पालकमंत्री करू अशा आणाभाका सांगून त्यांना गळाला लावले जाते.

भाजपचे सोडून गेलेले नेते तुमच्या संपर्कात आहेत काय? असे विचारले असता अजित पवार म्हणाले, मी उपमुख्यमंत्री असताना कुणी काही काम घेवून आले तर पक्षाच्या नजरेतून न पाहता प्रत्येकाचे काम करण्याचा प्रयत्न केला. आम्ही काय एकमेकाचे दुष्मन नाही. 16 आमदार अपात्र होवूनही आमदारांचे संख्याबळ सत्ताधार्‍यांकडे असल्याने सरकार कोसळणार नाही. याबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी आहे. एखाद्या आमदाराने मुदत मागितली तर सुनावणीलाच वर्ष जाईल. पक्षांतर बंदी कायद्यानुसार काय निर्णय द्यायचा याबाबत विधानसभेचे अध्यक्षच अधिकारवाणीने सांगू शकतील, असेही आ. अजित पवार म्हणाले.

औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर बोलताना अजितदादा म्हणाले, या प्रकरणातील मास्टरमाईंड शोधला पाहिजे. महाविकास आघाडीच्या काळात अशा घटना घडल्या नाहीत मग हे सरकार आल्यानंतर आताच कशा घडत आहेत? यातून जातीय द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news