

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : कुपवाड एमआयडीसीतील सूक्ष्म लघुउद्योजकांनी २५ ते १०० अश्वशक्तीच्या वाढीव विजेची मागणी महावितरणकडे केली आहे. मात्र यासाठी आर्थिक तरतूद नसल्याचे कारण सांगून महावितरण टाळाटाळ करीत आहे. शेजारील राज्यांपेक्षा महाराष्ट्रात विजेचे दर भरमसाठ आहेत. त्यामुळे काही उद्योग परराज्यात गेले आहेत. महावितरणने उद्योगांना वाढीव विजेचा पुरवठा न केल्यास काही उद्योग परराज्यात जाण्याच्या तयारीत आहेत.
कुपवाड एमआयडीसीतील सूक्ष्म व लघुउद्योजकांना वाढीव विजेचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुरेश खाडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य शासनाने उद्योजकांना २१० अश्वशक्तीपर्यंत विजेचा पुरवठा करण्याचे धोरण अवलंबले आहे. यानुसार कुपवाड एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी महावितरणकडे वाढीव विजेची मागणी केली आहे. मात्र महावितरणने आर्थिक तरतूद नसल्याने वाढीव विजेस नकार दिला आहे. वाढीव वीज हवी असल्यास त्या-त्या उद्योजकांनी नवीन रोहित्र संच उभारणीचा खर्च करून घ्यावा. त्यानंतर वीज जोडणी करून देण्याचा विचार करणार असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकांची वाढीव विजेच्या मागणीचा विचार करून कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू व इतर संचालकांनी कुपवाड एमआयडीसीत नवीन सबस्टेशनसाठी शासनाकडे भूखंडांची मागणी केली होती. एमआयडीसीने भूखंड देण्यास सहमती दर्शविली आहे. परंतु, महावितरणने योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. महावितरण कंपनीने भूखंड ताब्यात घेतल्यास कुपवाड एमआयडीसीत नवीन सब स्टेशन उभे राहील व सूक्ष्म व लघु उद्योजकांना वाढीव विजेचा पुरवठा होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
एमआयडीसीतील उद्योजकांच्या वीज बिलातून वीज वहन गळतीची वसुली महावितरण कंपनी करीत आहे. वीज वहन गळतीची रक्कम फार मोठी आहे. तसेच १ एप्रिलपासून वीज दरवाढ झाली आहे. शेजारील राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील विजेचे दर भरमसाठ असूनही उद्योजक केवळ उद्योग टिकावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत. महावितरण कंपनीने वाढीव विजेचा पुरवठा करण्यास नकार दिल्यास भविष्यात कुपवाड एमआयडीसीतील काही उद्योग परराज्यात जाण्याच्या तयारीत असल्याचा इशारा उद्योजकांनी दिला आहे.