

सातारा, पुढारी वृत्तसेवा : अदानींना मी पहिल्यापासून ओळखतो. या देशात अंबानी, टाटा, बिर्ला यांनी पाया रचून मोठे काम केले आहे. यामुळे रोजगार निर्माण होऊन अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. तशाच पद्धतीचे काम अदानी यांनी केले आहे. सुप्रीम कोर्टाने समिती नेमतो असे सांगितले आहे. समिती नेमल्यानंतर वस्तुस्थिती काय आहे ते समोर येईल. परंतु, आरोप झाल्यानंतर लगेचच अदानींना आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे चुकीचे आहे, असे परखड मत विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, जाती-पंथाचा वापर फूट पाडण्यासाठी, द्वेष पसरवण्यासाठी कुणी करू नये. जुने मुद्दे उकरून काढणे ही मुख्यमंत्र्यांची फालतुगिरी आहे, अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. सातारा तसेच जावली येथे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते आ. पवार आले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदाधिकार्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अदानींबाबत तुमच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते का? असे विचारल्यावर पवार म्हणाले, महाविकास आघाडी आणि फूट पडण्याचा काय संबंध आहे? सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे पाठीराखे आहेत. ज्यांनी मविआ निर्माण करण्यासाठी काम केले, ते सर्वजण पाठीशी असेपर्यंत काहीही होणार नाही.
सत्ताधार्यांच्या अयोध्या दौर्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, वास्तविक आम्हीही दर्शनाला जातो. पण आम्ही कधी चर्चा करत नाही. महाराष्ट्रातील महापुरुषांनी, आमच्या वडीलधार्यांनी सर्वांचा आदर, सन्मान ठेवायला सांगितला आहे. माणसा-माणसात फूट पाडण्यात, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये.
दोन दिवस नॉट रिचेबल असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? कितीदा सांगितले, तेच ते प्रश्न विचारलेले मला आवडत नाहीत. महागाई, बेरोजगारी कधी कमी होणार, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याचे काय, हे प्रश्न आहेत ना! कुणी कुणाला फडतुस म्हणायचं, कुणी कुणाला काडतुस म्हणायचं? काय चाललंय राज्यात? अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अवकाळीच्या पंचनाम्याबाबत भूमिका मांडताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पंचनामे करत नाहीत. याबाबतच्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात. सभागृहात याची चर्चा झाली होती. कर्मचार्यांचा संप होता. संपही मिटवून घेतो आणि पंचनामेही करायला सांगतो, असे त्यांनी सांगितले होते. जिथे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले तिथे आम्हीही विरोधी पक्षनेता म्हणून पंचनामे करायला सांगू शकतो. अवकाळी पाऊस, गारपीट किंवा नैसर्गिक संकट येते त्यावेळी शेतकर्याला मदत होण्याच्या दृष्टीने पंचनामे केले पाहिजेत हे बहुतेक जिल्हाधिकार्यांना माहिती असते, असे ते म्हणाले.