सातारा : सुमारे ३ लाख जुन्या वाहनांचे होणार काय? | पुढारी

सातारा : सुमारे ३ लाख जुन्या वाहनांचे होणार काय?

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  वाढते अपघात व प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ आणि २० वर्षे पूर्ण झालेली वाहने स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात भंगारात जाणारी २ लाख ७९ हजार १७२ वाहने आहेत. ही सर्व वाहने नव्या नियमानुसार भंगारात घालावी लागणार आहेत. दरम्यान, याबाबत कोणताही आदेश उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळाला नसल्याने सध्या वेट अँण्ड वॉच अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः अपघाताला जुनी वाहने कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सुस्थितीत वाहने नसल्यामुळे ब्रेक फेल, स्टेअरिंग लॉक, इंजिन नादुरूस्त अशा विविध प्रकारच्या तक्रारी येतात. त्यातच प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत असते. या सर्व बाबी विचारात घेऊन राज्य शासनाने जुनी वाहने स्क्रॅपमध्ये घालण्याचा निर्णय घेतला आहे.

वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असला, तरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अद्याप याबाबत कोणत्याही सूचना अथवा आदेश आलेला नाही. परंतु १५ वर्षे पूर्ण झालेली वाहने ज्यांच्याकडे आहेत, अशा लोकांना आता हुरहूर लागली आहे. या वाहनांचे पासिंग पुन्हा होणार का? असे विचारले जात आहे. अनेक गाड्या ३० ते ३५ वर्षे सलग वापरात आहेत. या वाहनांवर कोणी कारवाई करत नाही असा वाहनचालकांचा समज झाल्यामुळे ते जुनीच वाहने चालवत असल्याचे दिसून येत आहे.

सध्याच्या घडीला जिल्ह्यात ८ लाख ६४ हजार इतकी वाहने असून २ लाख ७९ हजार १७२ इतकी स्क्रॅपला जाणाऱ्या वाहनांची संख्या आहे. १५ वर्षांपर्यंत नवीन वाहन रस्त्यावरून चालवण्यास परवानगी असते. १५ वर्षांनंतर पासिंग केल्यास संबंधित गाडीला आणखी पाच वर्षांचा कालावधी वाढवून दिला जातो. त्यानंतर मात्र गाडी कोणतीही असो, ती रस्त्यावर चालवणे गुन्हा आहे. अशा गाड्या स्क्रॅप होतात आणि नंतर भंगारात घालाव्या लागतात.

Back to top button