सातारा : जलपुनर्भरणात साताऱ्यातील ग्रा. पं. राज्यात नंबर वन | पुढारी

सातारा : जलपुनर्भरणात साताऱ्यातील ग्रा. पं. राज्यात नंबर वन

सातारा;  प्रविण शिंगटे :  सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती जलपुनर्भरणात राज्यात नंबर वन ठरल्या आहेत. जलपुनर्भरणाच्या चळवळीत जिल्ह्यातील १,४९४ ग्रामपंचायतींमधील १ हजार १७० ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबविला आहे. हा उपक्रम पथदर्शी ठरला असून तो राबवणारी सातारा जिल्हा परिषद राज्यात एकमेव आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे जमिनीतील पाण्याची पातळी सामान्य होण्यास मदत करते. पावसाचे पाणी हे शुध्द आणि इतर अनेक प्रदुषक आणि मानवनिर्मित दूषित घटकांपासून मुक्त असते. शुध्द असल्या कारणाने ते जमिनीतील आणि वनस्पतीमधील मीठ वाहून नेऊ शकते. रेनवॉटरमुळे स्वतःचा सुरक्षीत व विनामुल्य असा पाणीसाठा असणार आहे.

घराच्या आवारात शोषखड्डाद्वारे पाणी मुरवणे शक्य

प्रचंड प्रमाणात होत असलेल्या पाण्याच्या उपस्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याकरता रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच एकमेव पर्याय राहिला आहे. ग्रामीण भागात जलयुक्त शिवार, वॉटर कप स्पर्धा, पाणी चळवळीच्या माध्यमातून शेत शिवार, ओढे नाले, डोंगराकडील भागात पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे वाहून जाणारे पाणी बंधारे, नालाबांधच्या निमित्ताने साठू लागले आहे. शहरी भागातही पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. यावरही पावसाच्या पाण्याचे संकलन करणे हाच पर्याय आहे. छतावरील पाणी एका ठिकाणी जमा करून ते विहिरीत सोडणे व आपल्या घराच्या आवारात शोषखड्डा निर्माण करून त्यात हे पाणी मुरवणे शक्य झाले आहे.

शहरी भागालाही होणार फायदा

देशात ज्या प्रकारे पाणी टंचाईचे संकट वाढत चालले आहे. हे पाहता प्रत्येक नागरिकांने आपापल्या स्तरावर पाणी बचतीचा प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच भागात भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत पावसाचे  पाणी आणि पाण्याचे स्त्रोत वाचवण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही एक प्रक्रिया आहे. ज्याद्वारे पाणीटंचाईवर मात केली जावू शकते. सर्वत्र पावसाचे पाणी वाचले तर दुष्काळग्रस्त भागाबरोबरच शहरी भागालाही याचा फायदा होणार आहे.

तालुकानिहाय स्थिती

सातारा तालुक्यातील १९१ ग्रामपंचायतीमध्ये १७० रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा उभारण्यात आली आहे. कोरेगाव तालुक्यातील १४२ ग्रामपंचायतींमध्ये १२७, खटाव तालुक्यातील १३३ ग्रामपंचायतींमध्ये १०२, माण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींमध्ये ५१, फलटण तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतींमध्ये १३०, खंडाळा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींमध्ये ६०, वाई तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींमध्ये ९९, जावली तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींमध्ये १०३, महाबळेश्वर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींमध्ये २१, कराड तालुक्यातील २०० ग्रामपंचायतींमध्ये १२३, पाटण तालुक्यातील २३४ ग्रामपंचायतींमध्ये १८४ असे मिळून १ हजार १७० ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे पुर्ण झाली आहेत.

Back to top button