![सातारा : अबब… ४५ गुठ्यांत १४० टन ऊस](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F12%2F%E0%A4%8A%E0%A4%B8.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सातारा; पुढारी वृत्तसेवा : म्हसवे (ता. सातारा) येथील प्रगतशील शेतकरी संदीप अर्जुन शेलार यांनी ४५ गुंठे क्षेत्रात १४० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले. या विक्रमी उत्पादनाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संदीप शेलार यांनी गतवर्षी एकरी ११० टनाच्या पुढे उत्पादन घेतले आहे. या युवक शेतकऱ्यांने सलग दुसऱ्या वर्षी ४५ गुंठे क्षेत्रात १४० मे टन. को ८६०३२ या ऊसाचे उत्पादन घेतले. त्यास वडील अर्जून शेलार, बंधू सचिन शेलार यांची साथ मिळत आहे. तसेच अमोल गायकवाड यांचेही वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. विक्रमी उत्पादनामुळे युवा शेतकरी व तरूण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. हा ऊस अंजिक्यतारा सहकारी साखर कारखान्याकडे गाळपासाठी पाठविण्यात आला होता.
४५ गुंठे क्षेत्रात को ८६०३२ उसाची लागण २१ मे २०२१ रोजी साडेचार फूटाच्या सरीवर एक डोळा लागण केली होती. त्यामध्ये दीड फुटाचे अंतर ठेवण्यात आले होते. या उसाला ठिबक सिंचन पध्दतीने पाण्याची व्यवस्था केली होती. उसाला सरासरी ५० ते ५२ कांड्या होत्या. उसाला वेळोवेळी सेंद्रिय खते, सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर विद्राव्य खतांचा ठिबकमधून वापर केल्याचे संदीप शेलार यांनी सांगितले.
उसाच्या विक्रमाची नोंद नवयुवक व तरुण शेतकऱ्यांनी घ्यावी. आपल्या शेतात विविध प्रयोग राबवून जास्तीत जास्त पिकांचे उत्पादन घेतल्यास आर्थिक फायदाही होणार आहे.
-संदीप शेलार, शेतकरी