सातारा : डेंग्यू, चिकुणगुणियाच्या रूग्णसंख्येत वाढ; जिल्हावासियांना धास्ती | पुढारी

सातारा : डेंग्यू, चिकुणगुणियाच्या रूग्णसंख्येत वाढ; जिल्हावासियांना धास्ती

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा जिल्ह्यात कोरोनानंतर आता डेंग्यू व चिकुनगुणियाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. वातावरणातील बदलामुळे अनेकजण तापाने फणफणले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत डेंग्यूचे व चिकुनगुणियाचे रुग्ण वाढले आहेत. डेंग्यूचे 318 तर चिकुनगणियाचे 38 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य आणि हिवताप विभाग अलर्ट झाला आहे.

जिल्ह्यात वातावरणात वारंवार बदल होत असल्याने साथरोगांत वाढ झाली आहे. थंडी, ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा व्याधींनी नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश रुग्णांमध्ये डेंग्यू व चिकुनगुणियासदृश लक्षणे आढळून आल्याने आरोग्य विभाग व हिवताप विभागाकडून गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. डेंग्यू अळ्या नष्ट करण्याबरोबरच संशयित नागरिकांचे मलेरिया चाचणीसाठी रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले. अनेकांना जिल्हा रुग्णालयात डेंग्यू चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला.

जिल्ह्यातील डेंग्यू बाधितांची संख्या 318 वर पोहोचली आहे. तसेच चिकुनगुणियाचे 38 रुग्ण झाले आहेत. याचबरोबर स्वाईन फ्लूचे रुग्ण देखील आढळून येत असल्याने जिल्हावासियांना धास्ती लागली आहे. डेंग्यू, चिकुनगुणियाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्ह्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, सर्व आरोग्य केंद्रांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सर्व्हेक्षण करून रक्ताचे नमुने घेतले जात आहे. बाधितांवर शासकीय रूग्णालयात उपचार केले जात आहे. काही नागरिक खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.

अंगावर दुखणे काढू नका

जिल्हा आरोग्य व हिवताप विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. घर व परिसराची नियमित स्वच्छता ठेवणे, घराजवळील पाण्याची डबकी बुजवणे, भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे, भांड्यांमध्ये जास्त काळ पाणी भरून ठेवू नये, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, कोणताही आजार अंगावर न काढता रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर अंगावर दुखणे न काढता डॉक्टरांकडून तपासणी करणे गरजेचे आहे.

Back to top button