सातारा : वेड पांघरुन पेडगावला जाणारे दिडशहाणे : खासदार उदयनराजे | पुढारी

सातारा : वेड पांघरुन पेडगावला जाणारे दिडशहाणे : खासदार उदयनराजे

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारकरांना विकास हवा आहे. पंपिंगचा खर्च करुन नव्हे तर गुरुत्वाकर्षण पध्दतीने पाणी हवे आहे.पेन्शनर्स सिटी ही सातारची ओळख पुसायची आहे. एकछत्री, स्वार्थी कारभार करणारे आणि संस्था, बँका मोडून खाणारे सातारकरांना नको आहेत. आमचे ढोल वाजवायचे सोडा, पण सातारकरांनी तुमचा ढोल जो चांगलाच बडवला आहे त्याचा विचार करा. सातारकरांच्या नावाखाली वेड पांघरुन पेडगांवला जाणारे किती दिडशहाणे आहेत, हे सातारकरांना आता समजून चुकले आहे, असा घणाघात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता केला.

आदरणीय स्वर्गीय काकांच्या माघारी टिका न करता, आपलं काम करत रहायचं, असं ठरवलेले होते. परंतु, यांचे ‘येरे माझ्या मागल्या’ सुरु
झाल्याने आम्हाला बोलावं लागतेय, असे नमूद करुन खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, पोवईनाका येथे ग्रेडसेपरेटर पाहिजे अशी मागणी सातारकरांची तसेच अनेक संस्था संघटनांनी केली होती. ती मागणी सर्वांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण केली. ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटनाच्या मुहूर्ताची वाट न बघता आम्ही तो जनतेसाठी खुला करायला लावला. त्यांनतर तत्कालीन पालकमंत्री यांच्या हस्ते ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन झाले त्यावेळी आज सातारकरांच्या आडून टिका करणारे संधीसाधू उद्घाटनाला पुढे-पुढे करत होते. हे दुटप्पी ढोंग आहे. ग्रेडसेपरेटरचे काम फसलेले नाही तर श्रेय लाटण्यात माहीर असतानाही तुमची येथे फसगत झाली आहे. हे तुमचे खरे अवघड जागचे दुखणे आहे. आज श्रेय तुम्हाला मिळत नाही म्हणून खिन्न होवू नका, खरे श्रेय विकासाचा ध्यास असणार्‍या सातारकरांचे आहे. पोवईनाक्यावर अनेकजण बसतात. त्यापैकी बनकर एक असतीलही किंवा नसतीलही, परंतु सर्वेक्षण शासन पातळीवर झाले आहे. आमच्या माहितीप्रमाणे बनकर त्यांना खूप घाबरतात. परंतु येथे तर उलट दिसतेय, त्यांनीच बनकरांचा धसका खाल्लेला दिसतोय, हे नवल आहे. आज अपवाद वगळता सर्व बसेस ग्रेडसेपरेटरमधूनच जात आहेत. पोवईनाक्यावरील वाहतुकीची समस्या निश्चितच संपुष्टात आलेली आहे. वाहतुकीच्या ऐन भरात देखील पोवईनाक्यावर कोंडी होत नाही ही वस्तुस्थिती आहे. उगाच तोंडाची वाफ दवडून, आपले अधिक हसे करुन घेवू नका, असा टोलाही खा. उदयनराजेंनी पत्रकात लगावला आहे. सातारकरांच्या विकासाकरता तुम्ही आजपर्यंत काय केले हे आधी सांगा. तत्वज्ञ नसतानाही दुसर्‍यास सांगे तत्वज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण, अशी तुमची अवस्था असल्याची टीका खा.उदयनराजेंनी केली आहे.

Back to top button