

सातारा ; पुढारी वृत्तसेवा तलवार व बंदुकीचा वापर करून मलवडी (ता. माण) येथे सोने-चांदी व्यावसायिकाकडील ५० तोळे सोने, ४० किलो चांदी व रोख सात लाख रुपये लुटल्याची घटना (रविवार) सायंकाळी घडली. या घटनेदरम्यान एका संशयिताने व्यावसायिकासह त्याच्या पुतण्यावर तलवारीने वार केले. तरीही, त्याला दोघांनी पकडून ठेवले. या संशयितास सोडवण्यासाठी लुटारूंनी गोळीबारही केला. त्यानंतर तिघे दुचाकीवरून पळून गेले. या खळबळजनक घटनेमुळे माण तालुक्यासह जिल्हा हादरला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मलवडी येथील बसस्थानक परिसरात मलवडी बुध रस्त्याकडेला आर. एल. कॉम्प्लेक्समध्ये श्रीकांत तुकाराम कदम यांचे जय भवानी ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर सायंकाळी साधारण साडेसात वाजण्याच्या सुमारास दुकानातील सर्व ऐवज त्यांनी तीन पिशव्यांमध्ये भरला. त्यात ४० तोळे सोने, साधारण ५० किलो चांदी व रोख सात लाख रुपये असा ऐवज होता. या पिशव्या घेऊन ते आपल्या दुचाकीवरून पुतण्या श्रीजित शिवाजी कदम याच्यासोबत घरी निघाले होते.
सात वाजून ४० मिनिटांच्या दरम्यान मलवडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व त्रिंबकराव काळे विद्यालयातील रस्त्याने जात असताना अचानक एकजण समोर आला. संशय आल्यामुळे श्रीकांत कदम यांनी दुचाकी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात अजून तिघेजण धावत आले. त्यांनी श्रीजितला जोरात धक्का दिला. श्रीकांत यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकी खाली पडली. खाली पडलेल्या तीन पिशव्या दोघा चाेरट्यांनी उचलाला. तिघे त्यांच्या दुचाकीकडे पळाले, तर एकाने तलवारीने श्रीजित याच्या हातावर, तर नंतर श्रीकांत यांच्या खांद्यावर वार केला. अशा अवस्थेतही या दोघा चुलत्या पुतण्यांनी मिळून एका दरोडेखोराला पकडून ठेवून जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली.
आपला साथीदार परत आलेला नाही, हे लक्षात येताच एक चाेरटा दुचाकीवरून परत आला. त्याने बंदुकीतून चार गोळ्या झाडल्या. यावेळी श्रीकांत यांनी पकडून ठेवलेल्या संशयितास पुढे केले. या चाेरट्याच्या पाठीला चाटून गोळी गेली. ही झटापट सुरू असतानाच ग्रामस्थ जमा झाले. यानंतर तीन चोरटे पळून गेले. या घटनेची माहिती दहिवडी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. पकडलेल्या चोरट्यावर प्राथमिक उपचार करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :