पाचगणी : महू हातगेघरचे पाणी शिवारात कधी खळाळणार?

पाचगणी : महू हातगेघरचे पाणी शिवारात कधी खळाळणार?

पाचगणी; इम्तियाज मुजावर : महाराष्ट्रातील सगळ्यात महागडा प्रकल्प म्हणून ओळखला जाणार्‍या व गेल्या 25 वर्षापासून सिंचनाच्या प्रतीक्षेत असणार्‍या जावली तालुक्यातील महू हातगेघर धरणातील पाणी शेतकर्‍यांच्या शिवारात कधी खळाळणार? असा सवाल येथील शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

5हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार्‍या या दोन्ही धरणांसाठी शेतकरी गेल्या पंचवीस वर्षापासून तडफडत आहेत. या धरणावर आजपर्यंत 900 कोटीपेक्षा अधिक खर्च झालेला आहे.दरम्यानच्या काळात अनेक सत्ता येऊन गेल्या, पण गेल्या 25 वर्षात पाण्याचा एक थेंबही शेतकर्‍यांना सिंचनासाठी मिळाला नाही, हे कडवट सत्य आजही शेतकर्‍यांना घास गोड लागू देत नाही. सिंचनाखाली येणार्‍या जमिनींचे वाटोळे झाले. कॅनॉलसाठी जमिनी दिलेल्या शेतकर्‍यांना मोबदला देखील मिळाला नाही, असे असंख्य प्रश्न आजही प्रलंबीत आहेत. ज्या उद्देशासाठी धरण निर्मिती झाली तो उद्देश गेल्या 25 वर्षापासून आजपर्यंत राज्यकर्त्यांना सफल करता आला नाही.
गेल्या 25 वर्षात दोन्हीही धरणातील जमा झालेल्या पाण्याची विल्हेवाट सिंचनाद्वारे कशी करायची? याबाबत अनेकवेळा कागदोपत्री प्रस्ताव बदलले, त्यावर करोडो रुपयाचा चुराडा देखील झाला. सिंचनासाठी जमिनी संपादीत केल्या गेल्या. त्या जमिनी खोदल्या, शेती उदध्वस्त केली व त्यानंतर जमिनीखालून पाईपलाईनचे काम सुरू झाले. आता हे पाईपलाईनचे काम अद्यापही प्रलंबित आहे.धरणाची अनेक कामे अपूर्ण आहेत तर काही ठिकाणी कामे झाली आहेत.

वास्तविक तालुक्यातील या दोन्हीही धरणातून कॅनॉलच्या माध्यमातून पाणी 5000 हेक्टरवर फिरणार होते. जेव्हा कॅनॉलच्या माध्यमातून हे पाणी फिरणार होते तेव्हा जमिनीतून त्याचे परक्युलेशन होऊन अनेक विहिरी पाणीदार होणार होत्या. मात्र, आता जमिनीखालून पाईपलाईनमधून 5 हजार हेक्टर क्षेत्र भिजणार तरी कसे? याचं कोडं शेतकर्‍यांना लागून राहिलेलं आहे.
धरणाचं पाणी मिळणार? दोन पिढ्या पाण्याच्या प्रतीक्षेत संपल्या तरी राज्यकर्त्यांना जाग येत नाही. याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news