लोणंद; पुढारी वृत्तसेवा: लोणंदचे बसस्थानक पावसामुळे पाण्याच्या डबक्यात आणि चिखलाच्या राड्यात गेले आहे. बसस्थानक आवारात पाणीच पाणी, चिखलच चिखल प्रवाशांचे हाल होत आहे. बसस्थानकातून पाणी जाण्याची सोय नसल्याने ही दुर्दशा झालेली नाही. खड्डे मुजवण्यासाठी जो मुरूम टाकण्यात आला होता त्याचा आता चिखल झाला आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र राडारोडाच झाल्याचे चित्र आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संताप आहे.
खंडाळा तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. पहिल्याच पावसात लोणंद बसस्थानकाची दुर्दशा झाली आहे. बसस्थानकातील साचलेले पाणी जाण्यासाठी मार्गच नसल्याने ठिकठिकाणी पाण्याची डबकी झाली आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवेश करतानाही प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. पाण्याचा अडथळा पार केल्यानंतर चिखलातून मार्ग काढताना घसराघसरी होते. त्यामुळे वृध्दप्रवासी, आजारी, लहान मुले यांचे हाल होत आहेत.
चिखलाच्या राड्यातुन सुटका करण्यासाठी एसटी अधिकार्यानी त्वरित मोठी खडी टाकून गैरसोय दूर करण्याची मागणी आहे. दरम्यान, लोणंद येथे शाळा, महाविद्यालयात शिकण्यासाठी शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी दररोज लोणंदला येत असतात. लोणंद बसस्थानकावर पास सुविधा बंद असल्याने विद्यार्थांना दररोज तिकीट काढून प्रवास करावा लागत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत
आहे.
लवकरात लवकर आरक्षण कक्ष व पास सुविधा सुरू करण्यासाठी लोणंद बसस्थानकात कर्मचार्याची नेमणूक करावी, अशीही मागणी होत आहे. आरक्षण कक्षही बंद लोणंद कर्मचारी बसस्थानकातील पालखीयात्रा नियोजनासाठी पंढरपूरला पाठवल्याने लोणंद बसस्थानकात पास देण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. लोणंद बसस्थानकातील आरक्षण कक्ष, विद्यार्थांची पास सुविधा कर्मचारी नसल्याने बंद केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईला जाणार्या प्रवाशांची संख्या अधिक असताना आरक्षण कक्ष बंद असल्याने अनेकांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.