सातारा : प्रेम प्रकरणातून जिंतीत खून | पुढारी

सातारा : प्रेम प्रकरणातून जिंतीत खून

फलटण : पुढारी वृत्तसेवा

प्रेम प्रकरणातून सातारा जिल्ह्यातील जिंती, (ता. फलटण) येथे मेहुण्यानेच भावजीचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये शकील अकबर शेख (वय 21) याचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित मेहुणा मोन्या निंभोरे (रा. साखरवाडी, ता. फलटण) याला ताब्यात घेतले आहे. आंतरधर्मिय लग्न केल्यानेच हे ऑनर किलिंग झाल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दीड वर्षांपूर्वीही संशयित मोन्याने भावजी शकील शेख याच्यावर जीवघेणा तलवार हल्ला केला होता.

शकील शेख याने साधारण दीड वर्षांपूर्वी मोन्या निंभोरे याच्या बहिणीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. दोघांनी आंतरधर्मिय लग्न केल्याचा राग मोन्याच्या मनात होता. लग्न झाल्यानंतर शकीलच्या पत्नीने आपले नाव बदलून खुशी असे केले. लग्न झाल्यानंतर शकील व त्याची पत्नी हे जिंती येथील विकासनगर येथे राहत होते. लग्न केल्यानंतर दि. 28 डिसेंबर 2019 रोजी मोन्याने शकील याच्यावर जीवघेणा तलवार हल्ला केला होता. मात्र, यातून शकील हा वाचला. यानंतर मोन्या हा शकील याचा खून करण्याच्याच बेतात होता.

दि. 16 रोजी दुपारी शकील व त्याचा मित्र विकास रघुनाथ आवटे हे दोघे दुचाकी (क्रमांक एम. एच. 11 एस 4434) वरून कपडे आणण्यासाठी रणवरे वस्ती येथे गेले. ते कपडे घेवून परतत असताना रात्री 9 च्या सुमारास शकीलच्या दुचाकीला गाडी आडवी मारत चार ते पाच जणांनी शकील याचे अपहरण केले.

शकील हा उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटूंबियांनी त्याची शोधाशोध केली. मात्र, तो मिळून आला नाही. त्यामुळे शकील याची पत्नी खुशी शकील शेख (वय 22) हिने त्याच्या अपहरणाची तक्रार दिली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे गतीमान केली. शकील याचा शोध घेत असताना पोलिसांना होळ, ता. फलटण येथे त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व पोनि नितीन सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दाखल झालेली अपहरणाची तक्रार व वर्णनावरून तो मृतदेह शकील याचा असल्याचे समोर आले. घटनास्थळी शकील याचा मृतदेह चिखलात पालथा आढळून आला. त्यामुळे चिखलात दाबून त्याचा खून केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.

अपहरणाची तक्रार व त्यानंतर खून झाल्यानंतर प्रेम प्रकरणातूनच खुशी हिचा भाऊ मोन्या यानेच खून केला असण्याची शक्यता गृहीत धरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोन्या मुळातच गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर ठिकठिकाणच्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Back to top button