![कराड](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F06%2FFASFSFSDF.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कराड : पुढारी वृत्तसेवा
कराड शहरात एका नाविन्यपूर्ण, अभिमानास्पद उपक्रमाची सुरुवात झाली. लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य देव देवतांचे दर्शन घेऊन आपले सांसारिक जीवन सुरू करतात. पण कराड व परिसरातील नुकतेच लग्न झालेल्या वेगवेगळ्या धर्मातील पाच नवदाम्पत्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांच्या स्मृती स्तंभावर पुष्पांजली वाहून अभिवादन करत मानवंदना दिली. या स्तूत्य उपक्रमाबद्दल या नव दाम्पत्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विजय दिवस समारोह समिती कराड, कराड नगरपरिषद व पंचायत समिती कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील प्रमुख उपस्थित होते. जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विजय दिवस समारोह समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, विजय वाटेगावकर, दिलीप चव्हाण, प्रा. बी. एस खोत, चंद्रकांत जाधव प्रा. डॉ. बी. जे. पाटील, प्रा. महालिंग मुंडेकर, प्राचार्या प्रज्ञा पाटील, रत्नाकर शानभाग, विलासराव जाधव, बाळा देवधर, बाळासो मोहिते, कुसूरकर, प्रा. जालिंदर काशिद, ऑ. प्ला. लेफ्टनंट बी. जी. जाधव, भरत कदम, प्रा. संतोष अंबवडे, प्रा. रवी अवसरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विजय दिवस समारोह समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते या नवदाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवदाम्पत्यांनी सांगितले की, आमच्यामध्ये एक वेगळे चैतन्य व स्फूर्ती निर्माण झाली आहे. शूर वीरांना अभिवादन करून दिलेली मानवंदना कायम आठवण देणारी ठरेल. कु. ऐश्वर्या पाटणकर हिने कविता सादर केली. प्रास्ताविक विलासराव जाधव यांनी केले. सुत्रसंचलन भरत कदम यांनी केले. प्रा. बी एस खोत यांनी आभार मानले
जयंत जयवंतराव जाधव व सौभाग्यवती आसावरी जाधव, अभिषेक बजरंग माने व सौभाग्यवती स्मिता माने, मुजफ्फर मुनाप सय्यद व सौभाग्यवती सय्यद, कौस्तुभ भिमराव पाटील व सौभाग्यवती प्रगती पाटील, शुभम सुनील जाधव व सौभाग्यवती मधुरा जाधव, इंद्रजित रमेश जाधव व सौभाग्यवती अनुजा जाधव या नवदाम्पत्यांचा सहभाग होता.