

सातारा : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या 'जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत (2020-21)' महाराष्ट्रातील सर्वाधिक पाच जिल्ह्यांनी बाजी मारली. त्यामध्ये सातारा जिल्हा अव्वल ठरला. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना उल्लेखनीय कार्यासाठी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सभागृहात केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे (2020-21) पुरस्कार वितरित करण्यात आले. सहसचिव अनुराधा वेमुरी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य नियंत्रण अधिकारी वेदमनी तिवारी यावेळी प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत' सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना 'उत्कृष्टता पुरस्कार' श्रेणीत गौरवण्यात आले. देशभरातून एकूण 8 जिल्ह्यांचा 'उत्कृष्टता पुरस्कार' श्रेणीत समावेश झाला होता. सातार्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी हे पुरस्कार स्वीकारले. सत्काराला उत्तर देताना शेखर सिंह म्हणाले, उत्कृष्टता पुरस्कार श्रेणीत सातारा पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आहे. पुरस्कार मिळाल्याचा मनस्वी आनंद होत आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सर्व अधिकारी कर्मचार्यांचा यात मोलाचा वाटा आहे.
कोविड महामारीच्या काळात केंद्र आणि राज्य शासनाच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जवळपास 1 हजार कोविड फ्रंटलाईन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. साहसी खेळ, ग्रामीण व कृषी पर्यटनासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली. कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रिया आणि कातकरी समाजातील लोकांना येत्या काळात कौशल्य प्रशिक्षण देण्याचा तसेच ग्रामीण व कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत देशभरातील 467 जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता. पुरस्कार निवडीसाठी दिल्ली आणि खरगपूर आयआयटीच्या तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली होती. स्पर्धेत विजयी ठरलेल्या 30 जिल्ह्यांना तीन श्रेणींमध्ये गौरवण्यात आले.