कराडात दुरंगी की बहुरंगी लढत? | पुढारी

कराडात दुरंगी की बहुरंगी लढत?

कराड : चंद्रजीत पाटील
तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नगरपालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत आत्तापासून तर्कविर्तक लढवले जाऊ लागले आहेत. कोणत्याही पक्षापेक्षा स्थानिक समीकरणे, भविष्यात राजकीय फायदा – तोटा आणि स्थानिक राजकारण याला या निवडणुकीत अन्ययसाधारण असे महत्त्व असते. त्यामुळेच कराडमध्ये निवडणूक दुरंगी होणार की बहुरंगी? याबाबत उत्सुकता आहे.

कराड शहरात शिवसेनेची ताकद मर्यादित आहे. मात्र, दोन ते तीन प्रभागातील जय – पराजय शिवसेना उमेदवारावर अवलंबून असतो, असे मागील पालिका निवडणुकीत पहावयास मिळाले आहे. शिवसेनेकडून महाविकास आघाडी म्हणून विश्‍वासात न घेतले गेल्यास स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले आहेत. दुसरीकडे भाजपाने स्वबळावर व पक्ष चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली आहे. मात्र, असे असले तरी लोकशाही आघाडी आणि भाजपा नेते डॉ. अतुल भोसले यांची वाढलेली जवळीक, सातारा जिल्हा बँक निवडणुकीपासून पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि डॉ. अतुल भोसले यांच्यातील मिटलेला दुरावा पाहता डॉ. अतुल भोसले समर्थक कोणती भूमिका घेणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

याशिवाय 2016 साली बहुमत मिळवलेल्या जनशक्‍ती आघाडीत तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. मागील निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनशक्‍ती आघाडीने बहुमत मिळवले होते. मात्र, या गटाचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या पराभवामुळे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निकटवर्तीयांकडे बोट दाखवत आठवडाभरात जनशक्‍ती आघाडीतील नगरसेवक राजेंद्र माने वगळता अन्य नगरसेवकांनी आमदार चव्हाण यांच्याशी फारकत घेतली होती. राजेंंद्रसिंह यादव गट कधी लोकशाहीच्या नगरसेवकांसोबत होता, तर कधी भाजपा नगरसेवकांच्या संपर्कात होता. त्यामुळेच सध्यस्थितीत हा राजकीय गट कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. या गटातील माजी नगरसेवक अरूण जाधव व माजी नगराध्यक्षा शारदा जाधव यांचा गट आमदार पृथ्वीराज चव्हाण गटासोबतच जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय याच गटातील तिसरा गट म्हणून प्रथमपासून अस्तित्व राखून असलेला माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील गट आमदार पृथ्वीराज चव्हाण गटासोबत जाईल, अशीच राजकीय परिस्थिती आहे. मागील काही दिवसांत शिवराज मोरे यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांसोबत जयवंत पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांची जवळीक वाढली आहे.

एकीकडे अशी सर्व परिस्थिती असताना लोकशाही आघाडीने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘साखर पेरणी’ म्हणून लोकशाही आघाडीकडून गाठीभेटींवर जोर देण्यात आला आहे. त्यामुळेच लोकशाही आघाडी कोणाला सोबत घेणार? याबाबत सर्वसामान्यांकडून तर्कविर्तक लढवले जात आहेत. आघाडी करणे, ही एकमेकांची गरजच कोणत्याही राजकीय गटाला स्वबळावर नगरपालिकेत बहुमत मिळणार नाही, अशी राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत कोणत्याही दोन प्रमुख गटांना एकत्रित यावेच लागणार आहे. याशिवाय डॉ. अतुल भोसले यांनी दूरगामी विचार करून वेगळी भूमिका घेतल्यास त्याचे राजकीय पडसाद भविष्यातील राजकारणावर उमटणार आहेत.

Back to top button