ना. बाळासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार
मिरज : पुढारी वृत्तसेवा
मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिरामध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते. प्रारंभी यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समितीचे सचिव विठ्ठल पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राजकारणात काम करावे लागते. पण त्याला नशिबाचीही साथ असावी लागते. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचे मोठे योगदान आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढे चालविला. यशवंतराव चव्हाण हे सुसंस्कृत नेते होते. आज देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील वातावरण बिघडलेे आहे. असे वातावरण ठिक करायला यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची गरज आहे. समाजात तेढ निर्माण करणार्यांना रोखले पाहिजे. मिरजेत 2009 मध्ये दंगल झाली. त्यावेळी मिरजेचे मोठे नुकसान झाले. आताही भूलथापा दिल्या जात आहेत. आता अशा भूलथापांना बळी पडू नका.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराने पुढे गेला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी चवळवळीचे आम्ही पाईक आहोत. यावेळी आमदर अनिल बाबर, आ. शहाजी पाटील, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील, आदी उपस्थित होते.