

सातारा : पुढारी वृत्तसेवा : अल्पसंख्यांक समाजातील नववी ते बारावीत शिकणार्या मुलींसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना केंद्र शासनाकडून यंदा प्रथमच एनएसपी पोर्टलवर राबवण्यात येत आहे. नववी-दहावी मधील मुलींसाठी पाच हजार रुपये तर अकरावी-बारावीसाठी दहा हजार रुपयांची ही शिष्यवृत्ती योजना असून राज्याच्या अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाकडून चालू शैक्षणिक वर्षात यंदा प्रथमच या योजनेची कार्यवाही करण्यात येत आहे.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेसाठी महाराष्ट्र राज्याचे नोडल ऑफिसर म्हणून पुणे येथील राज्याचे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक दिनकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासन मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमधून इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणार्या धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील (मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन) फक्त मुलींना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यंदा प्रथमच ही योजना एन एस पी पोर्टल वर लॉन्च करण्यात आली. पडताळणीसाठी शाळा स्तर व जिल्हास्तर असे दोन टप्पे ठेवण्यात आले आहेत.
अल्पसंख्यांक समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील आर्थिक कारणांमुळे शिक्षण पूर्ण करु न शकणार्या विद्यार्थिनींसाठी ही योजना सुरू केली आहे. शाळा-कॉलेज फी, पुस्तके खरेदी, शालेय उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी शिष्यवृत्तीची मदत होईल. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थिनी धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील असाव्यात, मागील वर्षीच्या इयत्तेत 50 टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे, एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल, इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. अशा या योजनेच्या अटी आहेत.
सक्षम अधिकार्यांच्या सहीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधार कार्ड, बँक पासबुक प्रत, अल्पसंख्यांक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट आदी कागदपत्र आवश्यक आहेत. सन 2021-22 मध्ये बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र राज्य मधून एकूण 48,555 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी सर्व जिल्ह्यातून 45,540 अर्जांची पडताळणी झाली आहे. योजनेतील अटी पुर्तता न करणारे, अपूर्ण स्वरुपातील तसेच कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने उर्वरित सर्व अर्ज डिफेक्ट किंवा रिजेक्ट करण्यात आले आहेत, अशी माहिती उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली.