सातारा : शामगाव घाटात वृक्षांच्या रंगांची उधळण | पुढारी

सातारा : शामगाव घाटात वृक्षांच्या रंगांची उधळण

पुसेसावळी : विलास आपटे : मार्च, एप्रिलच्या पूर्वार्धात येणारा वसंत ऋतू. या ऋतुला ऋतुंचा राजा असे संबोधले जाते. भारत हा अतिविशाल देश असल्याने देशाच्या विविध भागात वसंत ऋतूत येणारे हिंदू महिने वेगळेवेगळे आहेत. वसंत ऋतू मध्ये झाडाला पालवी फूटते. असेच दृष्य शामगावच्या घाटात पहावयास मिळत असून या घाटातील वृक्षांनी विविध रंगांची उधळण केल्याचाच भास होत आहे.
वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत फुलून उठतो. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो. स्वतःच्या आगळ्या सौंदर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो. मानवाने स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसंताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात. पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो. इंग्रजीमध्ये वसंत ऋतूला स्प्रिंग म्हणतात.

वसंत ऋतूमध्ये झाडाला पालवी फुटते. युरोपात मार्च-एप्रिल हे महिने वसंत ऋतूचे आगमन होते, तर ऑस्ट्रेलियातील वसंत ऋतू हा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात येतो.हिवाळ्याच्या कडकडीत थंडीने लोक हैराण होऊन जातात कारण थंडी आता सहन करण्याच्या पलीकडे गेलेली असते. आणि मग लोक सूर्याकडे पाहू लागतात की कधी त्यांना सूर्याची गर्मी मिळेल आणि तेव्हा आगमन होते वसंत ऋतूचे. वसंत ऋतूच्या आगमना बरोबरच लोकांची थंडी पासून सुटका होते.

वसंत ऋतू हा सगळ्या ऋतूंमधून सगळ्यात चांगला ऋतू समजला जातो. कारण वातावरण खूप प्रसन्न असते आणि दिवसभर मस्त वारा वाहत असतो. प्रसन्नपूर्वक ऋतूंमध्ये आपल्याला वातावरणामध्ये खूप सारे बदल बघायला मिळतात. हिवाळ्याच्या थंडीमध्ये झाडांची पाने गळू लागतात आणि वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन पाने येऊ लागतात. बागांमधे फुले येऊ लागतात आणि आपल्या वातावरणात आपला सुगंध पसरवतात.

झाडांवरती फळे येऊ लागतात.आंबा, जांभूळ, आवळा आणि संत्र खायला मिळतात. या ऋतूमध्ये पशु-पक्षी ही खूप प्रसन्न असतात म्हणून तर कोकीळ कुहू-कुहू करते आणि बागांमधे मोर नाचू लागतात. वसंत ऋतूच्या प्रसन्न वातावरणामध्ये होळीचा सुंदर उत्सव असतो. होळीचा सण आपल्याला दु:खानंतर नेहमी सुख येते, असा संदेशही देतो.

 

Back to top button