सातारा : शर्यतीची बैलगाडी पडली विहिरीत, दोन्ही बैल ठार | पुढारी

सातारा : शर्यतीची बैलगाडी पडली विहिरीत, दोन्ही बैल ठार

पिंपोडे बुद्रुक ; पुढारी वृत्तसेवा : बिचुकले (ता. कोरेगाव) येथे बुधवारी शर्यतीची बैलगाडी पळवत असताना बैलांना आवर घालणे गाडीवानाला शक्य न झाल्याने उधळलेली बैलगाडी बैलांसह विहिरीत पडल्याने दोन्ही बैल ठार झाले. सुदैवाने गाडीवान बचावला. या दुर्घटनेत बैलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

बिचुकले (ता. कोरेगाव) येथे बुधवारी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. आखाड्यात बैलगाडी पळवत असताना गाडीवानाला बैलांना आवर घालता आला नाही. उधळलेली बैलगाडी आखाड्यानजीक असलेल्या विहिरीत जाऊन पडली. सुदैवाने गाडीवानाने गाडीतून उडी मारल्याने तो बचावला आहे.

ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर अनेक जणांनी तेथून काढता पाय घेतला. यातील काही जणांनी वाठार पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर उपस्थितांकडून घटनेचा माहिती जाणून घेतली.

या माहितीवरून शर्यत आयोजक संदीप नारायण मोहिते (रा. फडतरवाडी, ता. फलटण), दत्तात्रय बाळकृष्ण पवार (रा. बिचुकले, ता. कोरेगाव), समीर (पूर्ण नाव माहित) (रा. आदर्की, ता. फलटण), बैलगाडी मालक लक्ष्मण दत्तात्रय झांजुर्णे (रा. तडवळे संमत कोरेगाव, ता. कोरेगाव) अप्पा पैलवान (पूर्ण नाव माहित नाही) (कुमठे, ता. कोरेगाव) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पाटील सचिन रामचंद्र कदम यांनी फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आयोजकांना ताब्यात घेतले आहे.

बिचुकले येथे आयोजित केलेल्या शर्यतीत मृत्यूमुखी पडलेल्या बैलांचे मालक मुंबई येथील असल्याची तर ती सांभाळण्यासाठी परिसरातीलच एका शर्यत शौकीनाकडे असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती. मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही बैलांची किंमत अंदाजे पाच ते सहा लाख रुपये असल्याची बैलगाडा शौकीन बोलत होते.

दरम्यान, बैलगाडी शर्यतीला राज्य सरकारकडून अटी व शर्ती घालून सशर्त अशी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अशी परवानगी मिळाल्यापासून उत्तर कोरेगाव तालुक्यातील अनेक गावात शर्यती आयोजित केल्या जात आहेत. मात्र, शर्यती आयोजित करताना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक असताना सुध्दा विनापरवाना बैलगाडी शर्यती आयोजित केल्या जात आहेत.

वारंवार आयोजित केल्या जात असलेल्या या शर्यतींकडे स्थानिक पोलीस मात्र दुर्लक्ष करत आहेत. यावरून पोलिसांच्या आशीर्वादानेच हे सर्व सुरू असल्याचे अधोरेखित होत आहे. वाठार स्टेशन पोलिस अशा विनापरवाना होत असलेल्या बैलगाडी शर्यतीच्या आयोजकांवर कारवाई करणार का? एखाद्या माणसाचा जीव जाण्याची वाट पोलिस पाहत आहेत? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

Back to top button