मिरज ; पुढारी वृत्तसेवा : खुनाचा प्रयत्न, दरोडा, घातक शस्त्र बाळगणे, शासकीय कामात अडथळा आणणे, विनयभंग असे विविध गुन्हे दाखल असलेले सांगलीतील तिघांना प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले.
हद्दपार करण्यात आलेल्या मध्ये संतोष विष्णू कदम (रा. हरिपूर रोड, सांगली) राहुल रमेश बाबर (रा. कोल्हापूर रोड, सांगली) विजय उर्फ पप्पू बजरंग फाकडे (रा. संभाजी चौक, सांगली) या तिघांचा समावेश आहे.
संतोष विष्णू कदम याच्यावर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच महापालिका सफाई कर्मचाऱ्यांवर दबाव आणून खंडणी मागणे, धमकावणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि महिलांशी अश्लील वर्तन करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
राहुल रमेश बाबर याच्यावर खुणाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, घरफोडी इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. तर विजय उर्फ पप्पू बजरंग फाकडे याच्यावर सावकारी, फसवणूक, विनापरवाना शस्त्र बाळगणे, मारामारी इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.
वरील तिघांवर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. त्यांना हद्दपार करावे, अशी मागणी प्रांताधिकार्याकडे करण्यात आली होती. प्रांताधिकारी शिंगटे यांनी याबाबत पोलिस आणि संबंधित याची सुनावणी घेतली. यानंतर वरील तिघांना सांगली आणि कोल्हापूर दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले असल्याचे सांगितले.