सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लम्पीस्कीन या आजराचा संसर्ग वाढतो आहे. मंगळवारी नव्याने 87 जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. तसेच 12 पशुधनांचा संसर्गाने बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात लम्पीचा संसर्ग आणि बाधित होऊन मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने पशुपालकांची धास्ती वाढली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 345 जनावरांना लम्पीस्कीनची बाधा झाली आहे. या आजाराची लागण होऊन मंगळवारी 12 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 82 जनावरांचा संसर्गाने बळी घेतला आहे. सध्या 838 पशुधनांवर उपचार सुरू आहेत. तसेच लागण झालेल्या 425 पशुधन उपचारानंतर बरी झाली आहे.
गेल्या महिन्यात लम्पीचे एक-दोन दिसणारे बाधितांचे आकडे आज 1 हजार 345 च्या घरात गेला आहे. दिवसेंदिवस संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तसेच आजाराची लागण होऊन मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. संसर्ग रोखण्यासाठी आता युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.