![सांगली : मिरजेतील सोनीत कोयत्याने 14 वार करून पैलवानाचा निर्घृण खून](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F12%2F%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सांगली; पुढारी वृत्तसेवा : सोनी (ता. मिरज) येथील आकाश माणिक नरुटे (वय 22) या पैलवानाचा पूर्ववैमनस्यातून कोयत्याने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली. मिरज ग्रामीण पाोलिसांनी अवघ्या 12 तासांत या खुनाचा छडा लावत तीन संशयितांना अटक केली आहे. त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे.
अटक केलेल्यांमध्ये उत्तम नरुटे (वय 22), दत्ता कदम (22) व सम्मेद चौगुले (19, तिघे रा. सोनी) यांचा समावेश आहे. सोनी-करोली रस्त्यावर मध्यरात्री आकाशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
डोक्यात, हातावर, पाठीवर मानेवर कोयत्याचे 14 वर्मी घाव होते. थरारक पाठलाग करून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मिरज शासकीय रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.