सांगली : जिल्ह्यात महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर
सांगली; शशिकांत शिंदे : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठका, भेटीगाठी आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी तयारीसाठी वसंतदादा प्रेमी उमेदवारांची शुक्रवारी स्वतंत्र बैठक बोलवली आहे. दुसर्या बाजूला शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी आम्हाला सहभागी करून न घेतल्यास आमचा हिसका दाखवू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात एकसंघ दिसणारी महाविकास आघाडी जिल्ह्यात मात्र फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम हे एकत्र येणार अशी चर्चा आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आपसात खलबत्ते झाल्याची चर्चा आहे. दुसर्या बाजूला वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, माजी आमदार अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांची नुकतीच बाजार समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने बैठक झाली. पक्षविरहीत निवडणूक आघाडी करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) संजय विभुते यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांवर तोफ डागली आहे. आम्हाला विचारात न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी शुक्रवारी वसंतदादा प्रेमी असलेल्या उमेदवारांची शुक्रवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील ही उपस्थित राहणार आहेत. त्यावरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे.
विधानसभेच्या अधिवेशनात कृष्णा नदी प्रदूषणावरून जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर आरोप करीत निशाणा साधला होता. स्वप्नपूर्ती ही कोणाची कंपनी आहे, असा सवाल त्यांनी केला होता. त्यानंतर विशाल पाटील यांनी बाजार समितीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी अद्याप भूमिका जाहीर केल्याचे दिसत नाही.
भाजप पक्षीय पातळीवर निवडणूक लढण्याच्या तयारीत
माजी आ. विलासराव जगताप यांनी पक्षविरहीत निवडणुकीची मागणी केली असली तरी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भाजपतर्फे निवडणूक लढविणार असे जाहीर केले आहे. भाजप एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाईल. पुढील आठवड्यात उमेदवारांची बैठक घेऊन पॅनेल निश्चित केले जातील, असे त्यांनी सांगितले.