सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गळीत हंगाम अद्याप अडखळतच असल्याचे चित्र आहे. एकोणीसपैकी जेमतेम चार कारखान्यांमधून सध्या तरी गाळप सुरू आहे. हंगाम गतीने सुरू व्हायला अद्याप पंधरा दिवस लागतील असेच चित्र आहे. जिल्ह्यातील एक खासगी आणि तीन सहकारी साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. अन्य कारखाने या आठवड्यात गाळप सुरू करतील असेच चित्र आहे. सुरू असलेल्या पैकी जेमतेम एकाच कारखान्यात प्रत्यक्ष साखर उत्पादन प्रारंभ झाला आहे. सुरू असलेल्या अन्य कारखान्यात एक – दोन दिवसांत साखर पडेल, असे सांगण्यात आले.
निनाईदेवी – दालमिया, हुतात्मा, क्रांती आणि उदगिरी शुगर्स या चार कारखान्यांमध्ये गळीत हंगाम सुरू झाला आहे. या कारखान्यांमध्ये आजअखेर 43 हजार टन उसाचे गाळप झाले आहे. उतारा देखील जेमतेमच आहे. दरम्यान, केवळ दत्त इंडिया कारखान्याने एकरकमी एफआरपी देण्याची घोेषणा केली आहे. अन्य कारखान्यांकडून अद्यापही 'एफआरपी वन् स्ट्रोक' की कसे याबाबत काहीच सुतोवाच झालेले नाही. यामुळे ऊसउत्पादकांत अस्वस्थता आहे.
दरम्यान, एफआरपीमधील वाढ, उसाचे मोठे उत्पादन, सक्षम तोडणी यंत्रणा यासाठी कारखानदारांची चांगलीच दमछाक होणार आहे.