विटा : महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भगवा मिळाला : आमदार बाबर

आमदार बाबर
आमदार बाबर

विटा : पुढारी वृत्तसेवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला होता. त्‍यावेळी कामाख्यादेवीच्या प्रथेबद्दल अनुदगार काढले गेले, परंतु त्याच कामाख्या देवीच्या आशिर्वादाने महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आम्हाला भगवा मिळाला अशा शब्दांत आमदार अनिल बाबर यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला देण्यात आला. याबाबत आमदार बाबर म्हणाले, आमच्या उठावाची कारणे वेगळी होती. वारंवार सांगूनही पक्ष नेतृत्वाने ती कधीही समजून घेतली नाहीत. आमच्या राजकीय अस्तित्वाला आव्हान दिले जात होते. पर्यायाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि पक्ष संपण्याच्या मार्गावर चालला होता.ना. एकनाथ शिंदे यांनी उठाव करून बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना पक्ष खऱ्या अर्थाने जोपासण्याचे काम केले. कायदा व बहुमत दोन्ही आमच्या बाजूने होते. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार याची आम्हाला खात्री होती. परंतु या सर्व घडामोडीत उठाव करणाऱ्या नेत्यांची तपश्चर्या आणि त्यांनी घेतलेले कष्ट त्यांच्या प्रतिमा, राजकीय वाटचाल याचा विचार न करता केवळ विशिष्ट एका नजरेतून आमदार, खासदारांसह उठाव केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना बघितले जात होते.

मूळात तो उठाव नव्हता तर बाळासाहेबांची शिवसेना एकवटली होती. जी उरली होती ती शिल्लक सेना होती. सार्वजनिक जीवनात काम करताना समाजहिताचा व विकासाचा विचार केला जाणे अपेक्षित आहे. परंतु आमच्याच काही जुन्या सहकाऱ्यांकडून कधी भावनेचा आधार घेऊन तर कधी अत्यंत खालच्या पातळीवर टीका करून राजकारण केले गेले. शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कामाख्यादेवीचा अनादर केला गेला. आमदारांच्याबाबतीत तर त्यांची प्रेते माघारी येतील अशा धमक्या देण्यात आल्या. महिला आमदारांबद्दल अनुदगार काढले गेले, हे सर्व निंदनीय होते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्या त आमच्या भूमिकेचे स्वागत झाले.

ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला ऐतिहासिक यश मिळाले. आता तर आमच्या हक्काचे चिन्ह, हक्काचा पक्ष व हक्काचा भगवा जनतेच्या आशिर्वादाने आणि कामाख्यादेवीच्या कृपाआशिर्वादाने मिळाला आहे. आमचे नेते ना. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक वाचाळवीर टीका करत सुटले असताना शिंदेसाहेबांनी विरोधकांच्या तोंडी लागण्याऐवजी विकासकामांचा धडाका लावला. केवळ सात महिन्यात मुख्यमंत्री कसा असावा हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. आजच्या निकालामुळे आम्हाला हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे. शिवसेनेचा हा विकासाचा झंझावात आता खऱ्या अर्थाने पुढे जाईल, असा मला शंभर टक्के विश्वास आहे असेही बाबर म्हणाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news