सांगली जिल्ह्यासह कृष्णा, वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वारणा धरणातून मंगळवारी (दि. 23) पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पाणी पातळी आणखी वाढण्याचा धोका आहे. दरम्यान, येथील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाजवळ सोमवारी सायंकाळी पाच वाजता 26.09 फूट पाणी पातळी होती. पाणी वाढण्याची शक्यता धरून येथीलसूर्यवंशी प्लॉट परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सांगलीसह जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्याशिवाय महाबळेश्वर, नवजा, चांदोली आदी भागातही पावसाचा जोर आहे. त्यामुळे पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. वारणा धरण भरत आल्याने पुढील 24 तासात केंव्हाही पाणी सोडण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने सांगितल्याने नदीकाठावरील लोकांना सर्तक राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कोयना धरणात 61. 97 टीएमसी म्हणजे 58.88 टक्के पाणी साठा झाला आहे. धरणात 75 टीएमसी पाणी साठा झाल्यानंतरच धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. वारणेतून मंगळवारी पाणी सोडल्यानंतर कोयनेतूनही पाणी सोडल्यास नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांना महापालिकेने स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान सध्या पडत असलेला पाऊस, नदीतील पाणी पातळी, कोल्हापूर जिल्ह्यात आलेला पूर या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून साडेतीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करावा, अशी मागणी महापूर कृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अलमट्टीतून सध्या दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.