विटा : पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा बँकेने खानापूर तालुक्यातील नागेवाडी साखर कारखान्याच्या कामगारांची देणी येत्या आठ दिवसात द्यावीत अन्यथा चालू अधिवेशनात लक्षवेधी लढा देणार असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील नागेवाडी साखर कारखान्याच्या कामगारांचा प्रश्न अखेर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात पोहोचला आहे. स्थानिक शेतकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भक्तराज ठिगळे आणि कामगार संघटनेचे दादू गुजले यांनी सांगली जिल्ह्यातील नागेवाडी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या गेल्या पंधरा वर्षांपासूनच्या थकीत देण्याबाबत सांगली जिल्हा बँक आणि साखर कामगार यांच्यात मध्यस्थी करण्याची विनंती केली. याबाबत अंबादास दानवे यांना शेतकरी सेनेच्या ठिगळे आणि गुजले यांनी नागेवाडी (ता. खानापूर) येथील तत्कालीन यशवंत सहकारी साखर कारखान्यातील जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांना सन २००६ ते २०१२ या काळातील पगार, प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी आणि अन्य असे एकूण ८ कोटी २८ लाख रुपये आज अखेर मिळालेले नाहीत.
दरम्यानच्या काळात सांगली जिल्हा बँकेने स्वतः ची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी यशवंत सहकारी कारखाना खासदार संजय पाटील यांना लिलावाद्वारे विकला. मात्र, त्यानंतर विद्यमान कारखाना आणि जिल्हा बँक या दोघांनीही कामगारांच्या थकीत पैशाबाबत हात वर केले. तेव्हापासून साखर कामगार हवालदिल झालेला आहे.
दरम्यान गेले २७ दिवस विटा (जि. सांगली) येथील तहसील कार्यालयाच्यासमोर साखर कामगारांचे धरणे आंदोलन सुरू आहे. जिल्हा बँकेच्या लेखा परीक्षण अहवालामध्ये यशवंत साखर कामगारांची देणी असे सदरी नोंद आहे. मात्र, बँक पैसे द्यायला टाळाटाळ करीत आहेत. बँकेने जी काही कागदपत्रे मागितली ती सर्व आम्ही दिली आहेत. मात्र, बँकेला पैसे द्यायचे आहेत का नाहीत? हा प्रश्न पडला आहे. तर दुसरीकडे साखर कामगारही आता शेवटचा लढा म्हणून या आंदोलनात उतरले आहेत. गेले २७ दिवस हा संघर्ष सुरू आहे. मात्र, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही.
शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचा हा यशवंत सहकारी कारखाना होता. तसेच ते जिल्हा बँकेचे ही संचालक आहेत. त्यांचे आमच्या प्रश्नाकडे लक्ष नाही, मतदार संघातील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. माजी आमदार, राष्ट्रवादीचे नेते सदाशिवराव पाटील हेही विट्यातील आंदोलनाकडे पाहत नाहीत. शिवाय महसूल प्रशासन पाहिजे त्या गांभीर्याने याकडे पाहत नाही, अशी माहिती देत अंबादास दानवे यांच्याकडे सर्व कागदपत्रे सुपुर्त केली आहेत.
याबाबत आपण लक्ष घालावे आणि लक्षवेधी करावी अशी विनंती शेतकरी सेनेचे ठिगळे आणि साखर कामगार दत्तू गुजले यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे केली आहे. त्यावर दानवे यांनी तात्काळ सांगली जिल्हा बँकेला पत्र देतो, आठ दिवसात कामगारांना पैसे न मिळाल्यास लक्षवेधी करू असे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा :