

MLA Suhas Babar Meet Nitin Gadkari
विटा : विटा शहराच्या बहुप्रतिक्षित बायपास (बाह्य वळण रस्ता) प्रकल्पाच्या मागणीला अखेर चालना मिळाली आहे. आमदार सुहास बाबर यांनी खासदार विशाल पाटील यांच्यासह गुरुवारी (दि.२३) नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विटा बायपासचा विषय प्राधान्याने मांडला. यावेळी मंत्री गडकरी यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आमदार बाबर यांनी दिली.
या भेटीत आमदार बाबर यांनी विटा शहराची सद्यस्थिती आणि वाढत्या वाहतूक समस्यांकडे मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले. विटा हे सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि प्रशासकीय केंद्र असून शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० (अहिल्यानगर–बारामती–फलटण–विटा–म्हैसाळ) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ ई (गुहागर–कराड–विटा–नागज–विजापूर) हे दोन्ही प्रमुख महामार्ग शहरातून जात असल्याने वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होत आहे.
अवजड वाहनांची वाढती वर्दळ, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भविष्यातील शहराचा विकास, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी विटा शहराबाहेर स्वतंत्र बायपास रस्ता होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.
यावेळी आमदार बाबर यांनी गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ ई वरील प्रलंबित कामेही तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. ही कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर मंत्री गडकरी यांनी संबंधित कामे लवकर सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे बाबर यांनी सांगितले.
तसेच रेणावी घाट, रेवणगाव घाट, सुलतानगादे, हिवरे आणि नागज घाट परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती आमदार बाबर यांनी दिली.