

आटपाडी : राजेवाडी (ता. आटपाडी) येथे बुधवारी रात्री सदगुरु साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी व खाजगी सुरक्षा रक्षकांनी गणेश पुजारी या तरुणास बेदम मारहाण केली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कारखान्यावर धाव घेत तोडफोड केली. या तोडफोडीत अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शेषगिरी राव यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पुजारी हे आपल्या एका सहकाऱ्याला ऍडव्हान्स पाहिजे असल्याने त्याच्या सोबत कारखान्याच्या गेटवर गेले होते. यावेळी पूर्वीच्या वादातून कारखान्यातील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या मारहाणीत गणेश पुजारी गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुजारी यांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच गावातील संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने कारखान्याकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयातील संगणक, प्रिंटर, मॉनिटर, वायरिंग, केबिन, फर्निचर आणि वे-ब्रिज यंत्रणेची अक्षरशः तोडफोड केली. त्यामुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे राजेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेबाबत अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.