

विटा : खानापूर तालुक्यातील वन जमिनींवर झालेल्या सामाजिक उपयोगाच्या कामांच्या ठिकाणी आणि वन जमिनीशेजारील मालकी हक्काच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर लागलेल्या वन विभागाच्या नोंदी रद्द कराव्यात, अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांकडे केली आहे.
खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये वन जमिनींवर झालेल्या सामाजिक उपयोगाच्या कामांच्या ठिकाणी आणि वन जमिनीशेजारील मालकी हक्काच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर लागलेल्या वन विभागाच्या नोंदींमुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बाबर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन, हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली असून, यावर शासनाकडून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले आहे. नागरिकांच्या या सर्व अडचणी दूर करण्यासाठी सदर नोंदींचा पुनर्विचार करून त्या रद्द कराव्यात, अशी आग्रही मागणी आमदार बाबर यांनी केली.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी याप्रश्नी गांभीर्याने लक्ष घालून सकारात्मक दखल घेतली असून, लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे आमदार बाबर यांनी माहिती देताना सांगितले.