सांगली : दिवसरात्र काबाडकष्ट करून एक अर्धा गुंठा प्लॉट घेतला. पत्र्याचे शेड मारून संसार सुरू केला, पण साल- दोन साल झाले की, महापूर या खोपटात घुसतो. सारा बाडबिस्तारा डोक्यावर घेऊन पुन्हा पळायला लागतं. महापूर घरात घुसला की कधी माघारी फिरेल माहिती नाही. फिरला तरी घरात गुडघाभर गाळ, घाण टाकून जातो. ते साफ करता-करता जीव नकोसा होतो. रोगराई-आजारपणात जीव जाईल का काय, अशी भीती वाटते. जीवाचं नुसतं हाल-हाल होतं. सूर्यवंशी प्लॉटमधून निवार्याला निघालेली बाई डोळं पुसत सांगत होती.
माघारी गेलेला पूर पुन्हा फिरून दारात, घरात आला आणि पूरपट्ट्यातील माणसांना पुन्हा संसार डोक्यावर घेऊन निवारा शोधत बाहेर पडावं लागलं. मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड, जुना बुधगाव रस्ता परिसरांतील घरात पुराचे पाणी शिरले आहे. हातात चार पैसे नाहीत, या परिस्थितीत घर सोडावं लागतं आहे. टीव्ही, पंखे, बेड, फ्रीज अशा वस्तू हलवायच्या तरी कशा? घरांसोबत दुकाने, टपर्यांना पण कुलपे घालावी लागली आहेत. अनेक व्यवसाय, दुकानं बंद आहेत. सारं साहित्य घेऊन ते दुसरीकडं नेताना त्यांचेही हाल सुरू आहेत.