शिराळा : शिराळा तालुक्यात अतिवृष्टी कायम आहे. तालुक्यातील दोन बंधारे, 9 पूल तर 21 गावांतील रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत. पुराचा धोका कायम असून 110 घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे शिराळा-शाहुवाडीचा संपर्क गेले 10 दिवस तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे विजेचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
तालुक्यातील चिखली- कांदे, देववाडी-काखे, देववाडी-ठाणापुडे, सागाव - सरुड, कांदे- सागाव, चरण - सोंडोली, मणदूर-अशोकनगर, आरळा- शित्तूर, कोकरूड-रेठरे, पुनवत-स्मशानभूमी, बिळाशी- भेडसगाव हे रस्ते अद्यापही पाण्याखाली आहेत. तालुक्यातील 53 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर 1885 जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत. वारणावती येथे दुपारपर्यंत 135 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणातील विसर्ग वाढविण्यात आला आहे. 11585 क्युसेक करण्यात आला आहे. धरण 86.28 टक्के भरले आहे.
शिराळा तालुक्यात पाच वाड्या वस्तीवर भूस्खलनाचा धोका कायम आहे. या गावांचा स्थलांतराचा प्रस्ताव शासनाकडे धुळखात पडला आहे. कोकणेवाडी येथील 47 कुटुंबे, भाष्टेवाडी 12, धामणकर वस्ती 7, मिरूखेवाडी 53, डफळेवाडी 35 या कुटुंबांची स्थलांतर होण्याची गरज व्यक्त होत आहे.