

सांगली ः राज्य बोर्डाची बारावीची परीक्षा दि. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहे. कॉपी रोखण्यासाठी यंदा कडक पावले उचलली जाणार आहेत. सीसीटीव्ही, ड्रोनची नजर असणार आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, संरक्षण भिंत आणि जाळीदार खिडक्या नसलेल्या केंद्रांची मान्यता रद्द होणार आहे.
यावर्षी परीक्षा पंधरा दिवस लवकर सुरू होत आहेत. त्या कॉपीमुक्त करण्यासाठी मंडळाने कठोर पावले उचलली आहेत. सर्व परीक्षा केंद्रांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. ‘सरमिसळ पद्धत’ (वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी एकत्र बसवणे) यावर्षीही कायम ठेवली जाणार आहे.
यासोबतच प्रत्येक परीक्षा केंद्रातील सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राला पक्की संरक्षक भिंत असणेही अनिवार्य आहे. मागील वर्षी ज्या केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडले होते, अशा केंद्रांची मान्यता यंदा रद्द केली जाणार आहे. मंडळाकडून सर्व केंद्रांची पडताळणी करण्यात आली आहे.
राज्य बोर्डाची बारावीची परीक्षा दि. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहे. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा सक्तीची आहे. केंद्राभोवती भिंत, स्वच्छतागृह, जाळीदार खिडक्या या सुविधा आवश्यक आहेत. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही, भिंत, स्वच्छतागृह या सुविधा नसल्यास केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. केंद्रांना सीसीटीव्ही बसवण्यासाठी 15 दिवसांची मुदत आहे. परीक्षेचे रेकॉर्डिंग 30 दिवस जतन करण्यात येणार आहे. परीक्षा संपताच सर्व केंद्रांवरील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले जाणार आहे. गैरप्रकार तपासले जाणार आहेत. आवश्यक सुविधा व व्यवस्था असल्याची पाहणी केली जाईल. कॉपी करताना विद्यार्थी सापडल्यास परीक्षा कायद्यानुसार कारवाई देखील होणार आहे.