जत : पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांच्या हाता तोंडाला आलेला घास हिरावून घेतला आहे. काही दिवसांतच द्राक्ष विक्रीस पाठवण्यात येणार होते. परंतु अवकाळी पावसामुळे जत तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचे अपरिमित कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी हातबल झाला आहे.
तसेच कर्ज काढून मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या कंठी येथील शेतकरी सुनील शिवाजी मदने यांच्या बागेचे सुमारे २६ लाखाचे नुकसान झाले आहे. हे सांगताना सुनील मदने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी तरळले. द्राक्षबाग कशी पिकवली हे सांगताना रडूही कोसळले. कंठी येथील शेतकरी सुनील मदने यांची दोन एकर द्राक्ष बाग आहे. अवकाळी पावसाने क्रॅकिंग होऊन शंभर टक्के नुकसान झाले आहे. हे नुकसान २६ लाख इतके असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तालुक्यातील अशा अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. त्यांना मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे. शासनाने विमा तात्काळ देण्याची कार्यवाही सुरू करावी.
तालुक्यातील डफळापुर कुंभारी कोसारी बिरनाळ, जिरग्याळ, मिरवाड, येलदरी, जत खोजनवाडी, वज्रवाड विशेषता पश्चिम भागातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही बागा फ्लावरिंग मध्ये आलेल्या होत्या. यामुळे झालेल्या पावसामुळे फळ कुजवा झाला आहे. तर काही बागा विक्रीस तयार झालेल्या होत्या. त्यात पूर्णपणे क्राकिंगने खराब झाले आहेत. या आपत्तीने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. अशा नुकसानग्रस्त बागांची वस्तुनिष्ठ पाहणी करून शासनाकडे सविस्तर अहवाल सादर करून मदत मिळवून देण्याची गरज आहे.
जत तालुक्यातील द्राक्षबागासह इतर फळ पिकांचे शेती पिकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहेत अपवाद वगळता कोणतेही नेते, अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत. वस्तुनिष्ठ पाहणी देखील व पंचनामा केलेला नाही. तरी तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हेही वाचा