

आरग : आरग (ता. मिरज) येथील एका जेवणाच्या पंगतीत तरुणावर झालेल्या खुनीहल्ल्यामुळे आरग गावातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तरुणांमधील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची ढिलाई यामुळे गावातील शांतता धोक्यात आली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरग परिसरात भुरट्या चोऱ्या ही नित्याची बाब बनली असतानाच, आता खुनीहल्ल्यासारख्या गंभीर घटना घडू लागल्या आहेत. गेल्या जानेवारीपासून गुन्हेगारीच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. ग्रामदैवत यल्लमादेवीच्या यात्रेत भाविकांचे लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबवले. त्यानंतर विविध उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये हाणामाऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. पंधरवड्यापूर्वी पाच ते दहा जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा खुनीहल्ल्याने गाव हादरले आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हद्दपार केलेले काही गुन्हेगारही गावात बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. या गुन्हेगारांमुळे गावातील गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे.