

प्रवीण जगताप
लिंगनूर : आखाती युद्ध पेटले आहे तिकडे व परिणाम भोगावे लागले आपल्या घराकडे, शेताकडे. परिणामी महागाईला तोंड द्यावे लागत आहे. युद्धामुळे शेतीतील हरेक साधने आणि आवश्यक बाबींची मोठी दरवाढ पंधरा दिवसांत झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सारे गणित विस्कटले आहे. महागड्या साधनांना घेऊन शेती करणार कशी आणि नफा तोट्याचे गणित घालणार कसे?
शेती म्हटले की पाणी हवेच... पण हे पाणी रानात, बांधात आणि प्रत्येक पिकाच्या मुळापर्यंत पोहोचले तरच सिंचन होईल आणि ते पीक जोमदार येईल. आता उन्हाचा पारा वाढला आहे. पिकांची पाण्याविना होरपळ सुरु आहे. अशा स्थितीत पाणी साठ्यापासून पाणी आणून पिकाच्या प्रत्येक ओळीत प्रत्येक मुळापर्यंत ते पाणी पोहोचवायला हवे. तर ते पीक जगेल आणि फुलेल. पण हेच पाण्याचे सिंचन आता महागाईच्या तडाख्यात सापडले आहे. युद्धामुळे सिंचन साधने बनविणाऱ्या कंपन्यांना लागणारा कच्चा माल म्हणजेच ग्रॅन्युअल्स, केमिकल, प्लास्टिक यांच्या किमती वाढल्या. परिणामी पीव्हीसी पाईप, ड्रिप इरिगेशनचे पाईप्स, व्हॉल्व्ह यांच्या किंमती वाढल्या. ही वाढ 15 ते 45% पर्यंत पोहोचली आहे. परदेशातून आयात केली जाणारी रसायने दीडपट ते दुप्पट महाग झाली. 50 ते 100% इतकी दरवाढ प्रथमच झाली. दरवाढीचा फटका थेट द्रवरूप रसायनांचा उपयोग करणारे शेतकरी तसेच या रसायनच्या मदतीने अन्य मोल्युक्युल बनवुन बनविली जाणारी औषधेही महाग झाली. तसेच पावडर फॉर्ममधील औषधे सुद्धा 20 ते 30% महाग झाली. खतांचे दरही वाढले.
साधनांची टंचाई : लिक्वीड रसायने, केमिकल यांची मागणी टिकून असूनही पुरवठा मात्र टंचाईमुळे पूर्ण विस्कळीत झाला आहे. काही औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना तर लिक्वीड रसायने मिळेनाशी झाली आहेत.
महागाईचा आगडोंब
महागाईचा भडका शेतात, रानात, बांधात, घरात पोहोचला. हाच भडका आता प्रत्येक वस्तूला घेरत चालला आहे... शेती साहित्य, शेती औषधे, खते, मानवी औषधे, अन्न पदार्थ, हॉटेल मधील सेवा, बांधकाम साहित्य, प्लंबिंग साहित्य, पाण्याच्या टाक्या, सिरॅमिक साहित्य, प्लास्टिक, केमिकल, रसायने कैक वस्तूंची भाववाढ झालीय, 15 टक्के पासून काही 150% पर्यंत हा महागाईचा आगडोंब उसळला.