

Vaibhav Patil joins BJP Chandrakant Patil
विटा: खानापूर आटपाडी मतदारसंघाने नेहमी भाजप च्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. आता वैभव पाटील यांच्या प्रवेशाने या मतदार संघातील भाजप आणखी बळकट झाला आहे, असे उद्गार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.
विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मंगळवारी (दि.१०) मुंबई येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि आमदार सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, वैभव पाटील यांच्या येण्याने खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघात भाजपची ताकद वाढली आहे. वैभव पाटील यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून लढवली होती. वैभव पाटील व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची वर्षानुवर्षे विटा शहरावर सत्ता आहे. विट्यात आमचे विनोद गोसावी वकील, अनिल अप्पा बाबर असे जुने कार्यकर्ते आहेत. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर व आटपाडीचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हे मोठे नेते देखील भाजपमध्ये काम करत आहेत. या सर्वांच्या बरोबर आता वैभव पाटील आल्याने पक्षाची मतदारसंघात मोठी ताकद वाढली आहे. विकासासाठी वैभव पाटील यांच्या पाठीशी राहू, असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, मुंबईत पक्षप्रवेश झाल्यानंतर विट्यात पाटील गटाने चौकात शक्तिप्रदर्शन केले. वैभव पाटील यांच्या प्रवेशासाठी युवक नेते पद्मसिंह पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते आज मुंबईला गेले होते. तिकडे प्रवेश होताच इकडे विट्याच्या शिवाजी चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. येत्या काही दिवसात विटा शहरात भाजपचा मोठा मेळावा घेऊन आम्ही शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे जल्लोष करणाऱ्या पाटील समर्थकांनी सांगितले.