निवडणुका जवळ येतील तसे उत्तरेकडून अनेक भोंदूबुवा महाराष्ट्रात यायला लागले आहेत. सर्वसामान्य माणसांची दिशाभूल करण्यासाठी ठराविक पक्षच त्यांना जाणीवपूर्वक महाराष्ट्रात आणतो आणि त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करताना दिसतो आहे. अशा भोंदूबुवांना महाराष्ट्रापासून दूर ठेवा, असे आवाहन डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सांगली शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या ‘करणी’ या विषयावरील राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज डॉ. दाभोलकर यांच्या उपस्थितीत पार पडले, यावेळी ते बोलत होते. व्ही. वाय. पाटील, प्रमोद चौगुले, महेश कराडकर, जगदीश काबरे, अन्वर हुसेन, वासुदेव गुरव उपस्थित होते.
डॉ. दाभोलकर म्हणाले, दाभोलकर यांच्यानंतरही अंनिसची चळवळ जोमाने सुरू आहे, हे ज्यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्यांना उत्तर आहे. गेल्या अकरा वर्षांत अंनिसने एकदाही कायदा हातात घेतला नाही. आपला विरोध संविधानिक मार्गाने व्यक्त करताना कला मदतीला येत असतात. धर्मसत्तेचा प्रसार करण्यासाठीहीपूर्वी कलांचा वापरच केला गेला होता. स्वतंत्र विचार करणारा कलाकार हा नेहमीच अशा सत्तांसाठी घातक असतो, आजही आहे.देशभरातील कानाकोपर्यातून भोंदूबुवांच्या जाहिराती सोशल मीडियावर झळकत असतात. त्यांच्यावर कोणाचेही कसलेही निर्बंध नाहीत, असे त्यांनी सांगितले. राहुल थोरात यांनी स्वागत, तर प्राचार्य बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. पारितोषिकप्राप्त विजेत्यांनीही मनोगत व्यक्त केले.