पलूस : पुढारी वृत्तसेवा
रेल्वे मंत्रालयाने अत्याधुनिक सुविधा असलेल्या कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी या दोन ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू केल्यामुळे प्रवाशांना जलद, आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. वंदे भारत सुरू झाल्याने सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल, असे मत माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यावेळी बोलत होते. यावेळी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष जे. के. बापू जाधव, पूजा विशाल पाटील यांच्यासह रेल्वेचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते.
आमदार डॉ. कदम यांच्याहस्ते एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. डॉ. कदम यांनी उपस्थित प्रवाश्यांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. यावेळी किर्लोस्करवाडी प्रवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी, रेल्वे अधिकारी, रामानंदनगर, बुर्ली, सावंतपूर, दुधोंडी, पुणदी, पुणदीवाडी, नागराळे व आमणापूर गावातील प्रमुख कार्यकर्ते व प्रवासी उपस्थित होते.