बागणी : विवेक दाभोळे
वाळवा तालुक्यातील शिगावसह भागातील शेकडो एकर क्षेत्रातील आगाप पिकांचे परतीच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अजून देखील पाऊस सुरूच आहे. परिणामी पीक नुकसानीची तीव्रता वाढणार आहे. याची दखल घेऊन शासनाने तातडीने हानी झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे. याआधी जुलैमध्ये शेतातील उसासह अन्य पिके वारणा नदीच्या पुराच्या पाण्यात बुडाली होती. त्यावेळी देखील काहीशा विलंबाने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. आता पावसाने झालेल्या हानीचे संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी हानीग्रस्त शेतकर्यांतून होऊ लागली आहे.
महापुरापाठोपाठ तुफानी पावसाचा शेतीला फटका
आठवड्यापासून भागात मुसळधार पाऊस
आगाप सोयाबीनसह अन्य पिकांची काढणी खोळंबली
पावसाने शिवाराची दैना, पिकांचे मोठे नुकसान
वारणा नदीच्या आलेल्या पुरात येथे नदीकाठची पिके बुडाली होती. यामुळे सोयाबीन, भुईमूग, ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता हीच पिके काढणीस आली आहेत आणि याचवेळी पाऊस सुरू झाला आहे. परिणामी शेतकर्यांना मोठ्या हानीस सामोरे जावे लागत आहे.वारणा नदीच्या महापुराचा नदीकाठच्या पिकांना सातत्याने फटका बसला आहे. या भागात नदीकाठच्या जवळपास सातशे हेक्टर क्षेत्रातील ऊस पिकाला आपल्या कवेत घेतले होते, तर आगाप सोयाबीन, हळद आणि भाजीपाला पिकांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागला होता.
वारणाकाठी गेल्या आठवड्यापासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. परतीच्या पावसाने शेतकर्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. बागणी, कोरेगाव भागात ऊस, सोयाबीन, भुईमूग यांसह भाजीपाला पिकांना पावसाचा फटका बसला आहे. हाता-तोंडाला आलेले पीक डोळ्यासमोर भुईसपाट झाल्याने शेतकरी निराश बनला आहे. उसाचे पीक भुईसपाट झाले आहे. आगाप सोयाबीन पीक जवळपास वायाच गेले आहे. सततच्या पावसाने भागातील पिकांच्या काढणी-मळणीची कामे खोळंबली आहेत. शेकडो एकर सोयाबीन, भुईमूग व भात काढणी व मळणी रखडली आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होऊन खर्चाएवढेही उत्पादन निघणार नसल्याचे चित्र आहे.