

विजय लाळे
विटा : खानापूर घाटमाथ्यावरची अग्रणी नदी पुनरुज्जीवन कामासाठी 2013 मध्ये पाहणी केली. त्यावेळी अग्रणीच्या उगमापासून काम होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्याठिकाणी अपेक्षित काम झाले नाही. आज अग्रणी नदी वाहती झाली असली तरी तिचा उगम मात्र कोरडाच राहिला, अशी खंत प्रख्यात, आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ आणि जल बिरादरीचे संस्थापक डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी एप्रिल 2024 मध्ये म्हणजे साधारणपणे 11 वर्षांनंतर बोलून दाखवली.
अग्रणी, कृष्णा नदीची एक महत्त्वाची उपनदी. जी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून वाहते. या नदीचा उगम जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तामखडी गावाजवळ अडसरवाडी गावाच्या हद्दीत होतो. पुढे सांगली जिल्ह्यातून 60 कि.मी. प्रवास करून 45 किमी अंतर पार करून कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात हुळगबल्ली गावाजवळ कृष्णेला मिळते.
अग्रणी नदीचे खोरे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी असे एकूण 5 तालुक्यांमध्ये सामावले आहे. जिल्ह्यातील 107 गावे या खोऱ्यात आहेत. या नदीच्या खोऱ्यात एकूण 7 पाणलोट क्षेत्रे आहेत. यात महांकाली नावाची नदी 22.5 कि. मी. लांबी असलेल्या उपनदीचा समावेश आहे. मात्र या नदीचे अस्तित्व खानापूर तालुक्यात गाळ, माती आणि झाडाझुडपांमुळे लुप्त झाले होते. 2012 च्या अखेरीस तालुक्यातील बळीराजा धरणाचे प्रणेते कॉ. संपतराव पवार हे पुण्यात जलबिरादरीच्या कार्यक्रमाला गेले असता त्यांनी डॉ. राजेंद्रसिंहांना अग्रणी नदीच्या दुरवस्थेबाबत माहिती दिली.
जलयुक्तशिवार योजना आणि लोकसहभागातून 2013 मध्ये अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन काम सुरू झाले. तब्बल दोन वर्षांच्या कामानंतर अग्रणी नदी पुन्हा प्रवाहित झाली. मात्र पुनरुज्जीवनाची कामे अपूर्ण असतानाच डॉ. राजेंद्र सिंहांसह जलबिरादरीच्या लोकांनी, राज्य शासनाच्या काही संबंधित अधिकाऱ्यांनी आणि जिल्ह्यातील काही अतिउत्साही मंडळींनी जणू अग्रणी नदी ही अस्तित्वातच नव्हती आणि ती आता नव्यानेच निर्माण केली, अशा थाटात पुनरुज्जीवनाची जाहिरातबाजी केली, ठराविक ठिकाणचे व्हिडिओ आणि फोटो काढून प्रसिद्धी केली. त्यामुळे नदी पहिल्यांदा ज्यावर्षी प्रवाहित झाली.
मात्र हे चित्र असतानाच दुसरीकडे टेंभू उपसा योजनेचे पाणी बलवडी (खा) गावाजवळील लेंडूर ओढ्यामार्गे अग्रणीकडे वळविल्याने तेथून पुढे पात्र प्रवाहित होते. तसेच गेल्या दोन-तीन वर्षांत जाधववाडी, गोरेवाडी या गावांच्या दिशेने ही टेंभूचेच पाणी वळविल्याने नदी पट्ट्याला पाणी मिळते. उगमाकडच्या अडसरवाडी- पोसेवाडी, तामखडी, ऐनवाडी वगैरे गावांना पाणी मिळत नाही. बलवडी बेणापूर, सुलतानगादे आणि पुढे तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी तलावापर्यंत अग्रणी नदी पात्राच्या दोन्ही बाजूंना गाळ आणि माती रचून ठेवल्याने केवळ कालव्याच्या स्वरूपात वाहत आहे.
खानापूर तालुक्यातील संपूर्ण नदीपट्ट्यात खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी नदीकडे पावसाच्या पाण्याचे येणारे नैसर्गिक प्रवाह अडवले गेलेले आहेत. अनेक ठिकाणी भरतीचे ओतही नष्ट केलेले आहेत. नदीपात्रातील गाव काढण्याच्या नावाखाली चांगली वाळू अक्षरशः खरवडून काढली गेली आहे. तसेच जिथे खडक आहेत ती ठिकाणे तशीच ठेवली आहेत. परिणामी काही ठिकाणी (उदाहरणार्थ करंजे गावाजवळ) मूळचा आकारच बदलला आणि नदीपात्रही वळवले गेले आहे. त्यामुळे एखादा मोठा पाऊस पडला तर एकाच वेळी तीन-तीन नद्या वाहताहेत असे दिसते. त्यातून नदीकाठाच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
‘करंजेत जलयुक्त शिवारातून बदलले नदीचे पात्र’ (दि.4 ऑक्टोबर 2015, रोजीची दै. ‘पुढारी’ ची बातमी) सुलतान गादे ते करंजे या दरम्यानचे अग्रणी नदी पात्राचीच अक्षरश: वाट लागली आहे. इथे नदीच्या पूर्वेकडच्या काठावर असलेल्या विठोबा मदने यांच्या शेतात चक्क बुलडोजर फिरवून पूर्वी 120 अंशाचे असणारे पात्र 90 अंशाने वळवण्यात आले आहे. त्यामुळे मदने यांची तब्बल दीड एकर शेती पात्रात गेली, तर दुसऱ्या बाजूला पश्चिमेकडचे पात्र आकसले आहे. करंजे ते रामनगर (जुनी मुलानवाडी) या रस्त्यालगत नदी पात्रात खासगी विहिरी पाडून अतिक्रमणे करून दिली आहेत.
अग्रणीतील 30 बांध वाहून गेले; वाळू उपशाचा फटका, नदीकाठच्या 15 विहिरी मुजल्या. (25 सप्टेंबर 2015, रोजीची दै. ‘पुढारी’मधील बातमी) गेल्या आठवड्यात एका दिवसात 64 मिलिमीटर झालेल्या पावसामुळे 30 हून अधिक माती बांध फुटले, शिवाय वाळू नसलेला गाळ जो कडेला रचून ठेवला होता, तो परत पात्रात ढासळला, नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करताना उपसलेला गाळ दोन्ही बाजूंच्या काठांवर रचला, परिणामी दोन्ही काठांच्या शेत जमिनीत प्रचंड अतिरिक्तपाणी साचून जमिनी खचल्या.
अथणी तालुक्यातील कृष्णा काठ परिसरात महापूर स्थिती असताना दुसरीकडे अग्रणी नदीचे पात्र मात्र कोरडे पडले (17 जुलै 2022, दै. ‘पुढारी’तील संबरगी गावच्या प्रतिनिधीने दिलेली बातमी) एकाच तालुक्यात परस्पर विरोधी स्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एकीकडे पाण्यामुळे पिकांना धोका तर दुसरीकडे पाण्याशिवाय पिके कशी जगणार, याची चिंता आहे.