सांगली : जिल्ह्यातील १७४ गावांत कडक लॉकडाऊन | पुढारी

सांगली : जिल्ह्यातील १७४ गावांत कडक लॉकडाऊन

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील १७४ गावांत कडक लॉकडाऊन कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील 174 गावांत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

या गावांत ये-जा करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसेच व्यापार व वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात येणार आहेत. आदेशाची अंमलबजावणी पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासनाने सुरू केली आहे.

आदेशाचा भंग केल्यास पोलिसांना कडक कारवाई करण्यास सांगितले आहे. आज रविवारपासून पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरणे मुश्कील झाले आहे. दिवसेंदिवस रुग्ण व बळींचा संख्या वाढतच चालली आहे. सांगली, मिरज शहरासह वाळवा, कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यातील रुग्ण कमी होत नाहीत. जिल्ह्यातील दररोजच्या रुग्णांचा आकडा एक हजारच्या आसपास स्थिर आहे. यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10.62 टक्क्यांच्या आसपास आहे.

राज्यात इतरत्र कोरोना कमी होत असताना सांगली जिल्ह्यात मात्र लाट वाढतच चालली आहे, याची गंभीर दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली. त्यामुळे शासनाने नेमकी परिस्थिती काय आहे, याची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञांची पथके पाठविली होती. त्यानुसार गुरुवारी राज्य शासनाचे पथक पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आले होते.

तसेच केंद्राच्या आरोग्य पथकानेही शुक्रवारी सांगली शहरासह काही गावांना भेट दिली. या दोन्ही पथकांतील अधिकार्‍यांनी जिल्ह्याच्या यंत्रणेतील अनेक त्रुटी दाखवून दिल्या. तसेच संसर्ग कमी होण्यासाठी काय करावे, याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी तातडीने सर्व प्रांत, तहसीलदार, बीडीओ यांना रुग्णसंख्या जादा असलेल्या गावांत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. संबधित ग्रामपंचायतींना तसे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतींनीही तसे आदेश काढून गावात ठिकठिकाणी लावले आहेत.

कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे : शिराळा तालुका – शिराळा, सागाव, मांगले, बिऊर, बिळाशी.
वाळवा – बोरगाव, साखराळे, बनेवाडी, मसुचीवाडी, ताकारी, गोटखिंडी, मर्दवाडी, मिरजवाडी, बावची, वाळवा, नवेखेड, जुनेखेड, अहिरवाडी, कामेरी, येडेनिपाणी, गाताडवाडी, तुजारपूर, शिरटे, किल्ले मच्छिंद्रगड, येडेमच्छिंद्र, तांबवे, कासेगाव, वाटेगाव, नेर्ले, काळमवाडी, बहे, कापूसखेड, पेठ, सुरुल,ओझर्डे, रेठरेधरण, चिकुर्डे, ऐतवडे खु, कुरळप, वशी, येलूर, तांदुळवाडी, कुंडलवाडी, बहादूरवाडी, कणेगाव, बागणी, ढवळी, फार्णेवाडी, कोरेगाव, आष्टा, इस्लामपूर या 46 गावांचा समावेश आहे.

पलूस तालुका- पलूस, कुंडल, रामानंदनगर, सांडगेवाडी, बांबवडे, माळवाडी, सावंतपूर, अंकलखोप, भिलवडी, दह्यारी, हजारवाडी, बुर्ली या 12 तर कडेगाव तालुक्यातील कडेगाव, कडेपूर, तडसर, वडियेरायबाग, मोहिते वडगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव, शिरगाव, रामापूर, चिंचणी, वाजेगाव, अंबक, आसद, सोनकिरे, सोनसळ, शिरसगाव, वांगी, शेळकबाव, नेवरी, हिंगणगाव बु्र, उपाळे मायणी, धनेवाडी या 22 गावांत कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

तासगाव तालुका- बोरगाव, आळते, कवठेएकंद, वासुंबे, चिंचणी, हातनोली, विसापूर, पेड, कुमठे, मणेराजुरी, मांजर्डे, आरवडे, सावळज, अंजनी, वडगाव, खुजगाव, दहिवडी, येळावी, निमणी, तुर्ची, बेंद्री या 21 तर कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची, कवठेमहांकाळ, देशिंग, नरसिंहगाव, हिंगणगाव, ढालगाव, इरळी, लंगरपेठ, रांजणी, बसाप्पाचीवाडी, करोली टी, कोंगनोळी या 12 गावांत कंटेन्मेंट झोन कडक करण्यात येणार आहे.

खानापूर तालुका- आळसंद, बलवडी, भाळवणी, हिवरे, गार्डी, खानापूर, खंबाळे, माहुली, मंगरूळ, नागेवाडी, वलखड, विटा या 12 तसेच आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडी, पिंपरी खुर्द, आटपाडी, मापटेमळा, लेंगरेवाडी, बोंबेवाडी, दिघंची, पुजारवाडी, करगणी, गोमेवाडी, खरसुंडी, नेलकरंजी, जांभुळणी या 13 गावांत ये-जा करण्यास बंदी घातली आहे.

मिरज तालुका- आरग, बेडग, काननवाडी, सावळी, सोनी, एरंडोली, मालगाव, मल्लेवाडी, सुभाषनगर, टाकळी, बामणोली, बिसूर, बुधगाव, कवलापूर, रसूलवाडी, दुधगाव, कवठेपिरान, सलगरे, म्हैसाळ, नरवाड, विजयनगर, हरिपूर, माधवनगर, नांद्रे 24 या गावांत निर्बंध कडक करण्यात आले आहेत. जत तालुक्यातील जत, डफळापूर, माडग्याळ, शेगाव, वाळेखिंडी, गुळवंची, बिळूर या 7 गावांत लॉकडाऊन कडक केला जाणार आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी प्रशासनाला कडक पावले उचलणे भाग आहे. जादा संसर्ग असलेल्या गावांत लॉकडाऊन कडक केला जाणार आहे. यासाठी महसूल व पोलिसांची मदत घेणार आहे. काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्राम दक्षता समितीवर राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. आदेशाचा भंग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे; अन्यथा यापेक्षा कडक धोरण अवलंबण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
– जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली

Back to top button